
छत्रपती शिवाजी महाराज
June 6, 2025 at 06:28 AM
*हिंदवी स्वराज्याच्या अरुणोदयाची स्वप्नपूर्ती,*
*शिवराज्याभिषेक सोहळ्याची....*
"प्रौढप्रताप पुरंदर,
क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर,
महाराजाधिराज महाराज,
श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय"
हे शब्द ऐकण्यासाठी भारतवर्षाचे कान आसुसले होते. या जयघोषाने रायगड दुमदुमला. *दिवस होता ६ जुन १६७४.*
*हा भारतवर्षाचा सोनेरी दिवस.'न भूतो ना भविष्यंती' असा सुवर्ण क्षण.स्वप्नवत अश्या 'माझे हिंदवी स्वराज्य' अर्थात सुराज्य या स्वप्नाची पूर्ती आजच्या दिवशी झाली.*
आता भारत वर्षात तुमच्या धर्म पालनाच्या आड जगात कुणीही आडवा येणार नाही,जिझिया कर लागणार नाही.
समस्त जनतेला स्वातंत्र्य मिळाले हा विश्वास निर्माण झाला.. शाश्वती मिळाली. "छत्रपती शिवाजी महाराज की जय.." या जयघोषाने सदैव नवसंचार,नवउर्जा चैतन्य निर्माण होते.
*भारत मातेवरचे,स्वराज्यावरचे प्रेम व्दिगुणीत होते.*
विजयनगरचे साम्राज्य संपुष्टात आले.मग सुजलाम,सुफलाम, सहिष्णु भारतावर आक्रमकांची वक्रदृष्टी पडली.
*सहिष्णु भारतीय संस्कृतीवर आदिलशाही,कुतुबशाही,निजामशाही,इंग्रज,पोर्तुगीज,डच अशा अनेक शत्रूंनी आक्रमण केले.तलवारीच्या जोरावर या बलाढ्य शत्रूंच्या जुलमी अत्याचाराने कळस गाठला होता.अशावेळी प्रजेला सुरक्षेची हमी देणाऱ्या हिंदवी स्वराज्याचे स्वप्न जिजाबाईंनी बाळराजेंपूढे ठेवले.त्यासाठी हिंदवी स्वराज्य संस्काराचे बाळकडू पाजले.*
शिवाजी राजांनी शुन्यातून विश्व निर्माण केले.बालवयातचं जिवास जीव देणारे सहकारी मिळवले.जनसामान्यांमध्ये धर्माप्रती,देशाप्रती प्रेम,त्यागाचा समर्पण भाव जागविला.
*स्वराज्य स्थापनेची शपथ घेत सतराव्या वर्षी स्वराज्याचे तोरण बांधले.*
अत्याचारी सत्तेला आव्हान दिले. आपल्या रामराज्याने प्रत्येक पंथाच्या,जातीच्या,धर्माच्या गळ्यातील छत्रपती शिवाजी महाराज ताईत झाले.
आता भारतवर्षाला औत्सुक्य होते महाराजांच्या राज्याभिषेकाचे.त्या अत्याचार पर्वात कित्येक शतके राज्याभिषेक सोहळाही जनता विसरली होती.
*राज्याभिषेकाने भयग्रस्त जनतेच्या जीवनात निर्भयतेने,आत्मविश्वासाने जगण्याची उभारी मिळणार होती.दहाही दिशांत लोकांना तुमचा राज्यधर्माचा तारणहार राजा आहे याची हमी मिळणार होती.शत्रूंमध्ये धाक निर्माण होणार होता.*
आणि घडलेही तसेच.
राज्याभिषेक सोहळ्यास भारतभरातील राजे,त्यांचे प्रतिनिधी सरदार,विदेशी व्यापारी असे सगळे जण नजराणे घेवून शिवाजीराजांना मुजरा करायला हजर झाले होते.
*शिवाजी महाराजांविषयी अपार प्रेम असल्याने लोकांचा उत्साह तर शिगेला पोहोचला होता.चार महिने या राज्याभिषेक सोहळ्याची तयारी सुरु होती.*
अखेर तो स्वप्नपुर्तीचा क्षण जवळ आला.शिवाजी महाराजांनी भवानी मातेचे दर्शन घेतले. आईचे आशीर्वाद घेतले.पहाटेचं महाराजांनी मंत्रोच्चारात सप्त नद्यांच्या जलाने स्नान केले. सोने,चांदी,तांबे,तसेच लोणी,तूपाने महाराजांची तुला झाली.कुलदेवतेचे स्मरण झाले.
महाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले.गळ्यात फुलमाळा होत्या. *मंत्रोच्चारात काशीहून आलेल्या गागाभटांनी हिंदू धर्माच्या पद्धतीने राजांचा राज्याभिषेक केला.डोक्यावर छत्र धरले गेले.पाच हजार फूट उंचीवरच्या रायगडावर ३२ मण सोन्याच्या सिंहासनावर महाराज आसनस्थ झाले. मुख्य पुजारी गागाभटांनी डोक्यावर मोत्यांची झालर ठेवत "शिवछत्रपती" असा उच्चार केला.सुगंधी फुलांसह सोन्याचांदीची फुले उधळली गेली.रायगडावर आणि स्वराज्याच्या सर्वच गडावरुन तोफांनी सलामी दिली.*
यानंतर महाराज लाल वस्त्र परिधान करून,अलंकारासह राज मुकुट घालून देखण्या घोड्यावर स्वार होत, जगदिश्वराच्या दर्शनाला गेले. परततांना हत्तीवरुन मिरवणूक निघाली.दोन हत्तीवर जरीपटका आणि भगवा झेंडा घेत प्रतिनिधी होते.सोबत अष्टप्रधानही होते.
सुखावलेली जनता फुले उधळत होती.दिवे ओवाळत होती. जनतेचा आनंद गगनात मावत नव्हता.हर्षभरीत लोक पुनश्च हिंदवी साम्राज्य निर्माण झाल्याबद्दल एकमेकांना शुभेच्छा देवू लागले.स्वराज्यातील न्यायी अशा भगव्या ध्वजाने आसमंत व्यापले होते.
*या भगव्या झेंड्याखाली भारतवर्षातील सर्वच जाती, धर्म,पंथ सुरक्षित झाले. "श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय.. !!" हा जयघोष आसमंतात निनादत होता.*
*राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी 'राज्याभिषेक शक' ही नवी कालगणना सुरू केली.ते शककर्ते बनले.'शिवराई' आणि 'होन' ही नाणी चलनात आणली जी पूढे १८६० पर्यत चलनात होती.मराठी भाषा संवर्धनासाठी 'लेखनप्रशस्ती' आणि 'राज्यव्यवहारकोश' ग्रंथ लिहून घेतले.राज्यातील व्यवहारात हिन्दी,उर्दू,पारसी भाषेऐवजी मराठी आणि संस्कृत भाषेची निवड केली.यामुळेच आज संस्कृत,मराठी भाषा जिवंत आहे.*
प्रतिपश्चंद्रलेखेव
वर्धिष्णूर्विश्ववन्दिता ।
शाहसूनोः शिवस्यैषा
मुद्रा भद्राय राजते |
छत्रपती शिवाजी महाराजांची ही स्वराज्याची राजमुद्रा.
*छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीयांचे दैवत.राज्य कसे करावे याचा आदर्श.या अव्दितीय राजे श्रीमंत योगींचा शिवराज्याभिषेक सोहळा जो आजही ३५१ वर्षानंतर रोमांचीत करतो.*
भारतवासीयांच्या मनाला प्रफुल्लीत करणारा,सदैव उभारी देणारा,चैतन्य निर्माण करणारा हा सोहळा आहे.
जिजाऊंचे हिंदवी स्वराज्याचे स्पप्न आपल्या मुत्सद्दीगिरी,शौर्य व आत्मबळावर साकारले. छत्रपती शिवाजी महाराजांचा "निश्चयाचा महामेरु,
बहुत जनासी आधारु,
अखंड स्थितीचा निर्धारु.. श्रीमंतयोगी जाणता राजा म्हणून गौरव होतो.
*आमची संस्कृती,धर्म टिकवणारे हे छत्रपती.यामुळेचं हा दिवस 'हिंदू साम्राज्य दिन' म्हणूनही संपन्न होतो.*
*छत्रपती शिवाजी महाराजांना शतशः वंदन, मानाचा मुजरा...!*
🙏🚩

❤️
🙏
6