छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज
June 12, 2025 at 04:17 PM
*लेख संदर्भ : आजचा माणूस अन् थकवा -*. आजकालच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनात आजचा माणूस स्वतःला हरवत चालला आहे.आजच्या मनुष्याच्या वाढत्या गरजा आणि अपेक्षा यामध्ये पुर्णपणे गुरफटलेला आहे.वास्तविक सुख सोडून नवीन स्वप्नांच्या मागे तो अविरतपणे धावत आहे.वर्तमानकाळाचं सुख हरवुन बसलेला आजचा मानव मात्र उद्याची आणि पर्यायाने भविष्याची चिंता करण्यातच रंगला असल्याचे चित्र आहे.त्यामुळेच तर आजचा माणूस हा थकत चालला आहे पण हा आलेला थकवा त्याच्या अंगाला नाही तर मनाला जास्त जाणवत आहे.आजकाल आपल्या अवतीभवती शरीराने नाही तर मनाने थकलेली, विचारांनी खचलेली,मन खच्चीकरण झालेलीच माणसं आपल्याला पाहायला मिळत असतात.प्रत्येक व्यक्ती आपणा सर्वांना बाहेरून हा हसत खेळत दिसत असतो.ऑफिस,बंगला, गाडी, स्मार्टफोन,त्याचं उच्च राहणीमान या सर्व गोष्टी वरुन समोरील व्यक्तीच्या सुखाचा अंदाज आपणा सर्वांना येत राहतो.पण आतुन तो व्यक्ती कसा आहे यांचा आपण विचारच करत नाही.तो आहे या सुखाच्या आयुष्यात तो सुखी आणि खुश आहे का? तो भौतिक जीवनात वावरताना कोणत्या जबाबदारी आणि अडचणींना तोंड देत असेल बरं? या गोष्टींच्या विचारांपासून तर आपण बेसावधच असतो.त्यामुळे तर मनुष्य हा कोणतेही सत्य पडताळून न पाहता आपल्या परीने आणि मनाप्रमाणे समोरील गोष्टीचा अर्थ लावत असतो.एक काळ असाही होता की,लोक जेव्हा दुखावले की आपल्या लोकांजवळ जाऊन दुःख सांगायचे.काही अडचणी आल्या की, लोक मदतीसाठी धावून जायचे.पण आजच्या या धकाधकीच्या जीवनात कोणालाही कोणाकडे लक्ष द्यायला अजिबात वेळ नाही.अगदी आपल्या माणसांकडे सुध्दा.... वरुन रुबाबदार आणि हसरा दिसणारा चेहरा आतून मात्र खोल काळोख आणि भयाण वास्तव शांतता असल्यासारखे वाटत आहे.आज तर विचारणं तर सोडाच पण सावरायला सुध्दा येण्याची मानसिकता उरलेली नाही.स्वत: ला आवरायचं अन् स्वतःला सावरायचं हीच आजची परिस्थिती आहे.आज तुम्ही कोणाला सहज जरी विचारले की कसा आहेस ? पण समोरुन का कुणास ठाऊक छान... मस्त हेच उत्तर ऐकावयास मिळते.पण खरंच सांगायचं तर आत खूपच मनात गोंधळ सुरू असतो.स्वत:च्या विचाराचं वादळ, अपयश, ताणतणाव,पुढील यश मिळवण्याची धडपड,न सुटणारे प्रश्न आणि त्यापासून लाभलेलं दुःख याचं एक मनात खोलवर चक्रीवादळ नेहमीच सुरू असतं.त्यामुळे तर आजचा मनुष्य मात्र शरीरानं नसला तरी मनानं पार खचून गेलेला आहे. मानसिक थकवा मनुष्य गणाला चिकटून बसला आहे.हे मानसिक थकव्याचे आजार वरुन कुठेही दिसत नसले तरी माणसांच्या मनात मात्र खोलवर शिरल्याचे प्रकर्षाने जाणवते.आज झोप आहे पण आराम नाही.सभोवताली लोक आहेत पण संवाद नाही.काम ,पैसा आहे पण समाधान नाही.हसायला जमतं पण आनंदी राहायला येत नाही.सर्व काही आपल्या जवळ असुन देखील पण मनातुन खुप काही हवरलं असल्याचं का बरं जाणवत असेल.यावर विचार विनिमय करुन निदान स्वतः साठी तरी वेळीच सावध झालेल बरं...हेच सत्य म्हणावं लागेल.घरची जबाबदारी, भोवताली लोकांच्या आणि समाजाच्या दबावापोटी,लोक काय म्हणतील या भितीपोटी...की जो पर्यंत आपण जिवंत आहोत म्हणून पळत राहायचं.शरीरानं थकलेल्या माणसांना औषध उपचार आणि विश्रांतीने आराम मिळू शकतो.पण थकलेल्या मनाला सावरायला कोण येईल? हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.मन नाजूक असतं..तुटत नाही पण गप्प राहतं आणि जे गप्प राहतं,ते एक दिवस कायमचं सोडून जातं....अगदी माणसांसारखं..... *लेखन -निलेश बन्ने*
❤️ 🙏 🌼 👌 8

Comments