
Yuti's Hub Library
February 20, 2025 at 08:54 AM
!!! राजा चंद्रहास !!!
भाग - ३३.
त्या मारेकऱ्यांजवळ मदनने संदेश दिले.... पहिला संदेश होता.. त्याच्या वडिलांकरितां...म्हणाला, बाबा, मला क्षमा करा!
https://www.shrutimundada.com/2021/08/10-effective-ways-to-relieve-stress.html
तुम्ही योजलेल्या मृत्यूचं प्रलयकारी सत्र आता माझ्या मरणाने संपुष्टात येईल. हा सूडाने पेटलेला धगधगता वणवा विझावा म्हणून मी स्वतःहूनच मरण ओढवून घेतले आहे.
बाबा, आता तरी पुत्राच्या बलिदानाने जागृत होऊन, हे घातपाताचं, सत्ता संघर्षाचं, कपटनीतीचं विषारी कांड आवरा. विवेकी व्हा. माझ्या मरणाने तरी तुमच्यातील सद् प्रवृत्तीची, सद् धर्माची बीजं रोवली जावी ही अपेक्षा! आता तरी सत्तेचा हव्यात सोडून द्या. बाबा, चंद्रहास हा मानद राजा आहे. त्याचा सहवासात मला त्याच्या महानतेचा सतत सत्काक्षार घडत आला. सनातन आर्य संस्कृतीचा तो निस्सीम उपासक पाईक आहे. त्याच्या संयमी जीवनशैलीने मी अगदी भारावून जात होतो. आपण त्याला शरण जा. कन्या देऊन तो जमात झालाच आहे, त्याच्या घातपाताचा विचार करून, स्वतःच्याच कन्येला वैधव्य दुःखात ढकलून पापाचे, नरकाचे अधिकारी होऊ नका. त्यांना शुभाशीर्वाद देऊन पुनित करा. एवढेच तुमच्याकडे मागणे....
मदनदांचा दुसरा संदेश होता त्याचा मित्र चंद्रहासला.... मित्रा, चंद्रहास! तुझ्यामुळेच माझे जीवन सुंदर झाले. मी खूप खूप धन्य झालो. तुझे विचार, आचार, उदात्त ध्येयवाद, तुझी ती लोकाभिमुख उत्कट राजनिष्ठा, धर्म सुसंगत राजनीती, आवलौकिक विचार पाहून, तू वयाने लहान असूनही तुला मी नेहमीच गुरुस्थानी मानत आलो. आज मला अलौकिक आनंद होत आहे.
आज तूं महाराज कुंतलेश्वरांचा जामात आणि कुंतलपूरचा अभिषिक्त राजा होत आहेस. तुझ्या या दोन्ही सोहळ्यास मला उपस्थित होत आले नाही याची किंचित खंत वाटते, पण तेवढाच आनंद देखील झाला, की दोन्ही राज्याचे विलीनीकरण होऊन, सत्ता संघर्ष संपुष्टात येईल. शत्रुत्व संपेल. माझं बलिदान सार्थकी लागेल. जीवनात आल्याचं आयुष्याचं सोनं झालं. मित्रा, तुझ्या शब्द अजून कानात घुमत आहे, "कुंतलपूर आणि चंदनावर्त यामधील तु दुवा आहेस या दोन्ही राज्यातील शत्रुत्व नष्ट करणे केवळ तुझ्या हातात आहे, यात तूच परिवर्तन घडवून आण. प्रसंगी प्राणार्पण करण्याची तयारी ठेव!" हे तुझे शब्द कसे विसरू?
राजा म्हणून आज्ञा आणि मित्र म्हणून हा संदेश मी पालन करीत आहे. पुढील प्रवासास अनुमती दे!
तिसरा संदेश होता, त्याची प्रिय बहीण विषयासाठी.... विषू! अ हं नाही..., विषयादेवी!
आतां तू महाराणी झालीस. हे सुभगे, तू धन्य आहेस. कुलाला पावन करणारी तू यशस्विनी ठरलीस. तुझ्या या उत्कर्षशील भाग्याचा मला खूप आनंद होत आहे. विवाहप्रसंगी मीच तुला आशीर्वाद दिला, कन्यादान केले. त्या सुखद क्षणाची स्मृती याही अवस्थेत आनंद देत आहे.
कुंतलपूरचा मी राजा व्हावा म्हणून, त्या राज्यासाठी, पिताजींनी कपटनीती आखली. किती रक्त सांडवलं, तेच हे कुंतलपूरचं राज्य तुला ओवाळणी दाखल मी माझ्या मृत्यूचं मोल देऊन तुला देत आहे.
विषू, पुनर्जन्मावर माझा विश्वास आहे. पुढचा जन्म तुझ्याच पोटी घेईल. तुला मोठा भाऊ म्हणून आशीर्वाद आहे. सुखी रहा!
मारेकऱ्यांना हा संदेश देऊन म्हणाला, तुम्ही जा... माझा निरोप पोहोचवा. जातो मी.
" सत्यमेव जयति नांनृतं सत्येन पंथा विततो देवयानः।
येननाक्रमंत्युषयो त्घाप्रकामा यत्र तत्सत्स्य परं निधानम्।।"
इकडे दुष्टबुद्धी आपल्या कक्षात बसून होता. त्याला सारखे उदास वाटत होते. कुठेतरी मनात शंकेची पाल चुकचुकत होती. दुसरं मन उकसवत होतं, अरेऽ, वेडा आहेस का? उभ्या आयुष्यात हार मानली नाहीस. कोणतेही कृत्य करताना डगमगला नाहीस. जिथे तुझं शौर्य अपूर पडलं, तिथे तू कपटीनीती वापरलीस. कधी नात्यागोत्याची तमा न बाळगता, तू कर्तव्य पार पाडून, जीवन समृद्ध केलेस. राजकीय वर्चस्व प्रस्थापित केलेस. मग आज ज्याची तुला भीती वाटत होती, तो काटा तू मोठ्या सीताफीने उपटून काढून मार्ग मोकळा केलास. आता तर तुला हवे ते करू शकतोस.
आता तो पुढील योजना आखू लागला. सकाळी एक सभा भरवून काही प्रस्ताव मांडणार होता. पहिला प्रस्ताव होता... राजकन्या चंपक मालतीचा मदनशी विवाह. तो सहजी तयार होणार नाही. आकांड ताकांड करेल. पण त्याची समजूत काढावी लागेल. दुसरा प्रस्ताव... राज्य सिंहासनाचा. कदाचित कुंतलेश्वर महाराज सहजासहजी प्रस्तावाला मान्यता देणार नाही. पण आजपर्यंत राज्याचे यश माझ्यामुळे झालेला उत्कर्ष, भरभराट ते कशी विसरतील? राहिला प्रश्न विषयाचा.. या प्रश्नाचे उत्तर काळच ठरवेल.
दुष्ट बुद्धी चंदनावर्ताहून आल्यापासून, राजवाड्याकडे फिरकला नव्हता. कारण त्याला भीती वाटत होती, महाराजांनी विचारले, प्रधानजी, चंपक मालतीसाठी वर शोधला का? तर काय उत्तर द्यावे? राजवाड्यात मदनला बोलावले. विषयाही तिकडेच गेली. चंद्रहासला चंडिका देवळात पाठवले होते. दुष्ट बुद्धीला खूप उदास, एकटे एकटे वाटत होते. मन अस्थिर झाले होते.
क्रमशः
संकलन व लेखन
मिनाक्षी देशमुख.
❤️
👍
🙏
3