
Yuti's Hub Library
February 23, 2025 at 11:29 AM
"जीवन दान "
" ती ..ती दोन नंबर ची साडी दाखवा बरं ..ती मोरपंखी...."
मधुरा ने साडी च्या दुकानातील सेल्समन काकांना त्यांच्या मागच्या रॅक कडे बोट दाखवत सांगितले..
" ही घ्या ताई ... मस्त चॉईस आहे तुमचा ..अगदी उठून दिसेल तुमच्या वर "
काकांनी सराईत पणे हे ' ग्राहकांना खुश करणारे वाक्य ' आणि ती साडी ...दोन्ही एकदमच मधुरा समोर प्रस्तुत केलं.
साड्या खरेदी हा एक संशोधनाचा स्वतंत्र विषय आहे . " ह्याच रंगात जरा वेगळा पॅटर्न दाखवा ना ..." आणि " ह्या पॅटर्न मध्ये काही वेगळा रंग आहे का?" ह्या तमाम स्त्री वर्गाच्या अतृप्त मागणीवर चर्चा अडकलेली दिसताच दुकान मालक " अरे राजाराम.. तो काल सुरत हून नवीन माल आलाय.. त्यातलं पॅकेट फोडून ताईंना माल दाखव बरं " असा रामबाण तोडगा काढत आदेश देतो .
मग अगदी जुनाच माल असला तरी बघणारी ताई अगदी खुश.....
रविवार चा दिवस असल्याने दुकानात बऱ्यापैकी गर्दी होती ..अर्थात मधुरा एकदम क्लिअर आणि फिक्स चॉईस ठरवून आली होती... मोरपंखी रंगाची शिफॉन ची साडी बस् !
त्यामुळे तिची खरेदी पटकन झाली सुद्धा!
हा खास चॉईस तिच्या आई साठी होता,अर्थात प्रसंग ही तसाच होता ...
तिची आई म्हणजेच उर्मिला ताई किर्लोस्कर यांची एकसष्ठी होती आठ दिवसांनी . आणि मोरपंखी रंग हा उर्मिला ताईंचा सर्वात आवडता रंग !
काऊंटर ला बिल पे करत असतानाच " एक शाल हवी आहे चांगली ...मोरपंखी रंगाची "
हे वाक्य तिच्या कानावर पडले . आवाज ओळखीचा होता ....प्रमिला मावशी चा.. हो प्रमिला मावशीच होती ती.. !
तिने बघून ही न बघितल्या सारखं केलं आणि पैसे देऊन , साडीची बॅग घेऊन ती तिथून बाहेर पडली.
प्रमिला मावशी ला पाहून , उगीचच मूड गेल्या सारखा झाला तिचा ..
पण अर्थात तिच्याकडे विचार करण्यासाठी फारसा वेळ ही नव्हता , आईच्या एकसष्ठी च्या सोहळ्याच्या तयारी ची खूप कामं राहिली होती , खूप मोठ्या आयोजनाचा घाट तिने आणि तिच्या मोठ्या भावाने म्हणजेच मयुर ने घातला होता, रीतसर हॉल बुक केला होता, कॅटरिंग वाला , सजावट वाला , हे सगळं झालं होतं ... आमंत्रण आणि इतर खरेदी सध्या सुरू होती .
उर्मिला आणि प्रमिला या दोन्ही बहिणी सांगली च्या गाव भागात राहणाऱ्या आबासाहेब आणि राधा ताई चिटणीस यांच्या कन्या... दोघींमध्ये तीन वर्षांचे अंतर , उर्मिला लहानपणा पासूनच दिसायला अतिशय देखणी , चुणचुणीत आणि हुशार होती , शिवाय घराण्यात जन्मलेली पहिली मुलगी म्हणून लाडाकोडात वाढली , तिला ' राणी ' हे सार्थ बिरूद देखील प्राप्त झालं
आणि खरोखरच ती एका परीकथेप्रमाणे आयुष्य जगली, जे हवं ते विना सायास मिळत गेलं , सर्व हट्ट प्रेमाने पुरवले जात होते.
त्या मानाने तिच्या पाठीवर जन्मलेली प्रमिला तशी उपेक्षितच राहिली , सतत थोरल्या बहिणीच्या छायेत वावरत राहिली . जन्मजात सहनशील , बुजरा आणि भिडस्त स्वभाव आणि त्या दुष्काळात तेरावा महिना म्हणजे गव्हाळ वर्ण घेऊन आलेली प्रमिला कायम मोठ्या बहिणी सोबत होणाऱ्या तुलने मुळे दबलेल्या अवस्थेतच जगली. ऊर्मी ताई ने वापरून जुने झालेले कपडे , वह्या पुस्तके आदि वस्तू
" चांगलेच तर आहेत की , कुठं खराब झालेत ?" अश्या समजुती सोबत तिने कोणती ही तक्रार न करता हसत हसत लहान पणी स्विकारले , ऊर्मी ताई कत्थक शिकायची पण तुटलेले घुंगरू तिच्या पायात टोचू नये म्हणून ते गोळा करण्याचा आटापिटा प्रमिला करायची , ताई च्या बॅडमिंटन च्या क्लास च्या वेळी तिची किट सांभाळायची . उर्मिला ला लहानपणा पासूनच खूप मैत्रिणी होत्या , मैत्रिणी घरी आल्या की बाहुला बाहुली च्या लग्ना पासून , भातुकली आणि इतर सगळे खेळ खेळताना प्रमिला ची भूमिका मात्र एक मदतनीसाचीच असायची.
हाय स्कूल ला दोघी जायला लागल्या तसं आबा साहेबांनी दोघींना एक सायकल घेऊन दिली , अर्थातच ती शिकण्याचा पहिला मान उर्मिलेचा ... पण तिला ती सायकल, काही केल्या जमेना , कधी पॅंडल मारायची तर बॅलन्स सुटायचा , बॅलन्स जमला तर वेग जुळत नव्हता .मग सायकल ची सिट पकडून तिला आधार देत मागे पळायचं काम अर्थातच प्रमिला च असायचं , सायकल चालवण्याचा अपयशाची उर्मिला ची चिडचिड मात्र प्रमिलेवर निघायची , प्रमिला मात्र कोणी ही न शिकवता स्वतः हून सफाईदार सायकल चालवायला शिकली . त्याचा जळफळाट आणि ईर्ष्या उर्मिलेला सहन होण्या पलीकडची होती , त्या रागातून तिने एकदा प्रमिला सायकल चालवत असताना हळूच मागच्या चाकावर लाथ मारून तिला खाली पाडले आणि " वाटेत दगड आला आणि ती पडली " अशी आवई उठवून दिली .त्या अपघातात प्रमिला रस्त्या कडेला असलेल्या एका खड्ड्यात पडली आणि पाय सायकल च्या चेन मध्ये अडकल्याने घोट्या जवळचे एक नाजूक हाड अश्या पद्धतीने तुटले की तो पायाचा अधू पणा तिला कायमस्वरूपी आला.
यथावकाश मुली मोठ्या झाल्या आणि तमाम वधू पालकांना असणारी लग्नाची काळजी आबासाहेब आणि राधाताईंना देखील लागली . पण अपेक्षेप्रमाणे देखण्या आणि हुशार असलेल्या त्यांच्या ' राणी साठी ' म्हणजेच उर्मिला साठी अनेक स्थळं स्वतः हून चालून आली . अखेर बराच चोखंदळ पणा आणि नखरे झाल्यावर उर्मिला ने पुण्याच्या गर्भ श्रीमंत किर्लोस्कर कुटुंबाच्या एकुलत्या एक मुलाला म्हणजे राजीव ला होकार दिला . एव्हढ्या मोठ्या घराण्यात मुलगी द्यायची आणि सोयरिक जमवायची याचं दडपण चिटणीस कुटुंबाला होता, पण " राणी" सगळं व्यवस्थित निभावेल ही खात्री ही होती .
झालं ही तसच ...धूमधडाक्यात लग्न झालं ,आणि हळू हळू संपूर्ण किर्लोस्कर घराची सत्ता उर्मिलाने आपल्या ताब्यात घेतली ...ती या घराची देखील राणी झाली .
यथावकाश ' मयुर ' आणि ' मधुरा ' च्या रूपाने एक समृद्ध आणि सुखी चौकोनी कुटुंब देखील आकारास आलं.
इकडे या सगळया धामधुमीत प्रमिला मात्र सर्व गोष्टीतून विरक्त होत गेली , तिची ऊर्मी ताई सासरी गेली तशी ती ही एकटी पडली, तिला लग्न , संसार या बाबतीत आधी पासूनच रस नव्हता , तिने लग्ना ला स्पष्ट नकार दिला , आणि लगेचच " ती आहेच जरा पहिल्या पासून जरा विक्षिप्त आणि विचित्र" किंवा " नाही तरी तिला कोण पसंत करणार आहे ?" असे नातेवाईकांचे टोमणे कधी कधी तिच्या मागे तर कधी कधी चक्क तोंडावर तिला ऐकावे लागले . तिचा स्वभाव , पायाचा अधू पणा किंवा रूप हा तिचा दोष नव्हता ,हे आबा साहेब आणि राधा ताईंना समजत होत, पण वयानुरूप थकल्या मुळे ते ही हतबल झाले होते , सुखी संसारात मग्न असलेल्या उर्मिलेने ही यात फारसा रस दाखवला नाही . त्यामुळे ह्या सर्वातून बाहेर पडण्यासाठी जेव्हा प्रमिला ने मनुष्य सेवेचं व्रत स्वीकारून नर्स बनण्यासाठी पुण्यातील सुकन्या नर्सिंग कॉलेज मध्ये जाण्याचा आयुष्यात केलेला " एकमेव आग्रह" आबा साहेबांनी देखील लगेच मान्य केला तो करताना कदाचित तिच्या सुखापेक्षा कसल्या तरी सुटकेचा निःश्वास त्यांनी टाकला होता.
प्रमिला पुण्यात नर्सिंग कॉलेज मध्ये रुजू होऊन वर्ष झालं तरी ती तिच्या ऊर्मी ताई ला भेटू शकली नव्हती , कारण उर्मिला कधी फॉरेन टूर तर कधी वेगवेगळ्या क्लब आणि मंडळांच्या कार्यक्रमांत व्यग्र असायची .
आता मधुरा शिक्षण संपवून एका मोठ्या कंपनीत नोकरी करत होती तर मयुरचे लग्न नुकतेच झाले होते , राजीव त्याच्या उद्योग व्यवसायात पूर्ण बुडालेला होता.... प्रमिला कुठे आहे ?काय करते ?
ह्याची कशाला कोण काळजी करेल ?
इकडे प्रमिला तिच्या मेहनती ,कष्टाळू स्वभावामुळे लवकरच एका मोठ्या इस्पितळात हेड नर्स बनली होती आणि
त्यांच्याच स्टाफ क्वार्टर मध्ये राहत होती
एकसष्ठी च्या कार्यक्रमा च्या आमंत्रण पत्रिकांची यादी बनवताना उर्मिला ताईंनी प्रमिला मावशी चे नाव सुचवताच ,मधुरा ने नाक मुरडत नाराजी दर्शविली
" अग असू दे..काही ही झालं तरी ती बहीण आहे माझी , आणि पुण्यातच राहते , शिवाय कार्यक्रमाला सगळे घरातले नातेवाईक येतील ... तसं बरं दिसत नाही , पाठव तिला पण कार्ड "
अशी मधुराची समजूत उर्मिला ताईनी काढायचा प्रयत्न केला.
अर्थात मुलांच्या मनात स्वतः च्या बहिणी ची विक्षिप्त , विचित्र अशी प्रतिमा
बिंबवण्यास उर्मिला ताईच कारणीभूत होत्या . त्याच त्या दोघींचे बालपण आणि त्या काळातील घटना सांगून आपण कसे तिला सांभाळण्याचा प्रयत्न केला हे समजावायच्या . कुठल्या ही घरगुती समारंभात किंवा सोहळ्यात प्रमिला कधीच येत नसे किंवा सर्वांशी फटकून , आलिप्त राहायची ,त्यामुळे मुलांच्या मनात देखील ही भावना दृढ झाली होती .
पण अखेर उर्मिला ताईंच्या आग्रहा मुळे मधुरा ने निमंत्रण पत्रिका प्रमिला मावशी कडे पाठवून दिली होती.
आता एकसष्ठी चा सोहळा चार दिवसांवर आला होता , घरात धामधूम सुरु होती , जय्यत तयारी करण्यात आली होती , एकसष्ठी साठी खास बनवलेले दागिने उर्मिला ताई घरातच गळ्यात घालून पहात होत्या आणि अचानकच त्यांना छातीमध्ये जोरात कळ आली आणि त्या जागीच कोसळल्या ... क्षण भर कोणालाच काही समजलं नाही , आणि मग एकच गोंधळ उडाला , तोंडावर पाणी मारून बघितलं , काही प्राथमिक उपचार करून बघितले पण त्या काही शुद्धीवर आल्या नाहीत ,
तत्काळ रुग्णवाहिका बोलावून त्यांना मोठ्या इस्पितळात दाखल केले गेले ,
उर्मिला ताईंना उच्च रक्त दाबाचा त्रास होताच , त्या शिवाय लेफ्ट वेंट्रीक्युलर हायपोट्रॉफी चा म्हणजेच एल वी एच आजार ही होता म्हणजेच हृदय पूर्ण कार्य क्षमते नुसार काम करीत नव्हते !
किर्लोस्कर कुटुंबाच्या आर्थिक आणि सामाजिक वजनामुळे त्यांच्या नेहमीच्या फिजिशियन सोबतच एक सुसज्ज आणि अनुभवी हृदय रोग विशारद डॉक्टरांची संपूर्ण टीम आता त्यांना वाचवण्या साठी प्रयत्नांची शर्थ करीत होती , पुण्यातले सर्वात अनुभवी डॉक्टर डॉ.हेमंत भागवत परिस्थिती वर लक्ष ठेवून होते.
त्यांनी राजीव ,मधुरा आणि मयुर ला केबिन मध्ये बोलावले
" काय झालं सर ? आई कशी आहे ? तिला बर वाटेल ना ? "
केबिन मध्ये आल्या आल्या मधुरा ने प्रश्नाची सरबत्ती सुरू केली
" होल्ड ..होल्ड..." तिला थांबवत डॉक्टर म्हणाले
" हे पहा एक डॉक्टर म्हणून मी तुम्हाला कुठल्याच भ्रमात ठेवू इच्छित नाही , आपल्याला ठाऊक आहेच की त्यांच्या हृदयाची कार्य क्षमता एल वी एच मुळे खूपच कमी झाली आहे , त्यामुळे सर्जरी करून देखील हृदयाला असणारा धोका टळणार नाहीये "
" मग डॉक्टर...आता काय उपाय आहे ?"
राजीव चा धीर आता सुटू लागला होता
" सांगतो " डॉ भागवत त्याच धीर गंभीर सुरात पुढे बोलू लागले
" हा त्यांना आलेला अटॅक एक अॅडवान्स कार्डिओमायोपथी आहे म्हणजे एंड स्टेज कंडीशन "
" डॉक्टर काही तरी उपाय असेल ना पण यावर ? तुम्ही खर्चाची काही काळजी करू नका ... फक्त आई ला यातून वाचवा "
डॉक्टरांचं बोलणं पूर्ण होण्याआधीच मधुरा रडवेली होत म्हणाली .
" बेटा इथे पैसा महत्त्वाचा नाही ...योग्य आणि वेळेत केलेले उपचार महत्त्वाचे असतात ! यावर एकच उपाय आहे तो म्हणजे हार्ट ट्रान्सप्लांट करणे .."
डॉक्टरांनी तिला समजावले .
" पण सर आता हार्ट ट्रान्सप्लांट सहज शक्य असत ना? .. तुम्ही प्लीज ते अरेंज करा " हात जोडून विनवणी करत राजीव म्हणाला
" तुमचं खरं आहे मिस्टर किर्लोस्कर पण ते वाटतं तेव्हढ सोपं नसतं , त्या साठी सुटेबल हार्ट डोनर , तो ही जवळच्या जवळ , उपलब्ध असायला हवा , शिवाय वेळ खूप महत्त्वाचा असतो , डोन्ट वरी आम्ही ऑलरेडी डोनर रिक्वेस्ट पाठवली आहे , संपूर्ण नेटवर्क मध्ये , अजुन आठ ते दहा तासात सुटेबल डोनर उपलब्ध होईल अशी आशा आहे ! गुड लक "
असे म्हणत टेबल वरचा स्टेथोस्कोप गळ्यात अडकवून किर्लोस्कर कुटुंबाला अस्थिर , तणावात ठेवून डॉ भागवत केबिन मधून बाहेर पडले.
इकडे मात्र सर्व जण काळजीत बुडाले, कार्यक्रमा साठी आलेले नातेवाईक , मित्रमंडळी सगळे हॉस्पिटल मध्ये हजर झाले , देवाचा धावा सुरू झाला , राजीव किर्लोस्कर आपल्या ओळखी आणि नेटवर्क वापरून हार्ट डोनर साठी प्रयत्न करू लागले
" बाबा .. चला डॉक्टरांनी बोलावलंय आपल्याला " हे मयुर चे वाक्य ऐकुन मधुरा आणि राजीव एकदम दचकून भानावर आले.
" बहुतेक त्यांना डोनर मिळालाय " हे पुढचं वाक्य ऐकुन तर दोघांनी अक्षरशः डॉ. भागवतांच्या केबिन कडे धावच घेतली.
" गुड न्यूज मिस्टर किर्लोस्कर... फायनली वी हॅव गॉट सुटेबल डोनर ऑफ हार्ट फॉर युवर वाईफ.... कंडिशनिंग झालं की आपण लगेच ऑपरेट करू शकू "
आता मात्र तिघांच्या आनंदाला आणि आनंदाश्रु ना पारावार उरला नाही , ते घळा घळा वाहू लागले
डॉक्टरांचे आभार कसे मानावे हेच त्यांना समजेना आणि केवळ कृज्ञतापूर्वक हात जोडले गेले ! ..
त्याच रात्री उशिरा उर्मिला ताईंचे ऑपरेशन यशस्वी झाले ! आता आठ दहा दिवस हॉस्पिटल मध्ये राहून मग त्या घरी परतणार होत्या. दरम्यान ज्या डोनर व्यक्ती ने उर्मिला ताईंना हे ' जीवन दान " दिले त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना भेटून या कधी ही न फिरणाऱ्या उपकारा बद्दल आभार मानण्यासाठी आणि जी काही आर्थिक मदत लागेल ती करण्यासाठी माहिती घ्यायला .. राजीव ,मधुरा आणि मयुर हॉस्पिटल प्रशासना च्या कार्यालयात गेले पण
" माफ करा मिस्टर किर्लोस्कर पण ज्या डोनर चे हृदय तुमच्या मिसेस ना ट्रान्सप्लांट केलंय त्यांच्या इच्छे नुसार त्यांचे नाव आम्हाला गुप्त ठेवावे लागेल , त्यांनी केवळ हृदयच नव्हे तर किडनी आणि डोळे देखील दान केलेत आणि शरीर देखील आमच्या मेडिकल कॉलेज साठी डोनेट केलय "
असं त्या हॉस्पिटल च्या चीफ मेडिकल ऑफिसर ने त्यांना सांगितले
हे ऐकुन तिघांना ही खूप भरून आले , वाईट ही वाटले ,
पण त्यांनी अखेर खूप आग्रह केल्यावर
ते सांगायला तयार झाले
" ज्या व्यक्तीने त्यांचे हृदय दान केलं आहे त्या आमच्या हॉस्पिटल च्याच हेड नर्स होत्या ...प्रमिला मावशी ... आय मिन प्रमिला चिटणीस "
हे ऐकुन मधुरा चा श्वास आणि आवंढा दोन्ही गळ्यातच अडकले , राजीव आणि मयुर ला ही प्रचंड धक्का बसला होता !
काय बोलावं हे सुचेना ,
" आर यू श्युअर ? " अविश्र्वासाने मयुर ने विचारले
" येस ऑफ कोर्स .... प्रमिला मावशी आमच्याच स्टाफ होत्या , रविवारी त्या कुठे तरी कपड्याच्या दुकानात गेल्या होत्या तिथून येताना त्यांच्या रिक्षाला एका टेम्पो ची धडक बसली , त्यांच्या डोक्याला जबर मार लागला होता , इथे त्यांना ब्रेन डेड अवस्थेतच दाखल करण्यात आलं होतं , त्या आमच्या हॉस्पिटल मध्ये बरेच वर्ष काम करीत होत्या त्या मुळे आम्ही त्यांना वाचवण्या साठी शर्थीचे प्रयत्न केले पण दुर्दैवाने त्यांच्या त्या अवस्थे तून आम्ही त्यांना बाहेर काढू शकलो नाही आणि त्यांनी काही वर्षांपूर्वी त्यांनी केलेल्या इच्छा पत्रा नुसार त्यांचे अवयव दान करण्यात आले "
मधुरा साठी हे सर्व ऐकणे आता कानात तप्त शिसाचा रस ओतल्या प्रमाणे होत ! "
प्रमिला मावशी ??? आपण जीला कायम तिरस्कृत केलं, टाळलं , तिने आईला हे जीवन दान दिलं ?? आणि रविवारी हा अपघात झाला म्हणजे आपल्याला साडीच्या दुकानात ती भेटल्यावर तिथून परतत असताना तिच्या वर हा काळाचा घाला घातला गेला होता ! "
ही चुटपुट ... अपराधी पणाची भावना तिला आता सहन होत नव्हती ....ती रडतच तिथून बाहेर पळाली ...
अखेर दहा दिवस रुग्णालयात काढल्यावर उर्मिला ताईना डिस्चार्ज मिळाला , घरी आल्यावर त्यांचं स्वागत करण्यास सगळे हजर होते , मृत्यू ला पराभूत करून आल्या बद्दल त्यांचं कौतुक होत होते ...
मधुरा आतल्या खोलीत गेली आणि एक मोरपंखी शाल आणून आई ला पांघरली आणि स्वतः चे ओले डोळे पुसले ...
हीच शाल प्रमिला मावशी ने रविवारी तिच्या ऊर्मी ताई साठी घेतली होती . प्रमिला मावशी च्या सहकारी नर्स ने मधुरा कडे आणून दिली होती .....
मधुरा ला ही ती शाल पांघरलेल्या आई कडे पाहून जाणीव झाली की
आयुष्य भर केवळ " सहन" करणारी प्रमिला मावशी जाता जाता तिच्या आई ला हे अमूल्य " जीवन दान " करून देऊन गेली होती
तिची आई जरी नावाने असली तरी ..प्रमिला मावशी खऱ्या अर्थाने कर्माची ' राणी ' होती.
@ सागर जोशी
👍
❤️
🙏
👌
22