मराठी अपडेट्स - Marathi Updates
मराठी अपडेट्स - Marathi Updates
February 7, 2025 at 07:20 AM
काही माणसांना कामे न करण्यासाठी जसे हजार बहाणे ज्ञात असतात आणि ते त्याचा खुबीने उपयोग करून घेतात; तसेच अनेकांना परिस्थिती प्रतिकूल असतानाही कामे शोधून काढून ती करण्यासाठी हजारो कारणे हजारो पर्याय माहिती असतात. असे असणारे आणि कुठल्याही कामाची लाज न बाळगता कष्ट करत, त्यातून ज्ञानवर्धन करत अनुभवसंपन्न होत पुढे जाणारी माणसे भेटली की फार बरं वाटतं. काम न करणाऱ्यासाठी कामचं सापडत नाहीत आणि काम करणाऱ्यासाठी कामाची वानवा नसते. काही उदाहरणे सांगते. आमच्या ऑफिसला एक सिनिअर आहेत, त्यांच्या उच्चभ्रू एरियात पहाटे पहाटे एक मुलगा येतो कामाला, त्याच्याकडे त्या एकाच मोहोल्ल्यातली ७-८ घरे आहेत. त्याचं काम त्यांच्या घरातील कुत्र्यांना सकाळी फिरवून आणण्याचं आहे. एका कुत्र्याला फिरवून आणायला १५ मिनिटे लागतात, या हिशोबाने २ तासात तो एका मोहोल्ल्यातले काम संपवतो. पगार आहे प्रत्येकी २००० रुपये महिना. रोजच्या दोन तासांच्या कामात तो १५-१६ हजार रुपये महिना कमावतो. त्यानंतरच्या वेळेत तो कदाचित दुसऱ्या मोहोल्ल्यात हेच काम करत असावा किंवा दुसरी कामे. असाच आमच्या इमारतीत एक मुलगा येतो. त्याची ना कुठली कंपनी आहे ना कुठला ब्रँड. वन मॅन कंपनी. तो कार धुवायचे काम करतो. प्रत्येकाकडे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा. त्यात डीप क्लिनिंग, वॉटरलेस वॉश असे अनेक प्रकार आहेत.. त्याच्याकडे सध्या २०-२२ घरे आहेत म्हणे जिथे त्याला नियमित जावे लागते. एका घरचे २-३ हजार रुपये महिना मिळत असावेत असा अंदाज धरला तरी ४० हजाराच्या घरात त्याची मिळकत असावी. मुंबईला आमच्या सोसायटीत एक वयस्कर काका यायचे. फार दुरून लोकलने यायचे त्यांच्या हातात दोन मोठ्या पिशव्या असायच्या. एका दिवशी एका एरियात असे ते आठवडाभर सात वेगवेगळ्या एरियात फिरायचे. त्यांच्या पिशवीत सकाळचा लागणार नास्ता असायचा. म्हणजे सहा इडल्या आणि चटणीचे पॅकेट, तसेच ढोकळ्याचे, ठेपल्याचे, उपमा, अप्पे, सँडविच. शिवाय अंडी, दही, फरसाण, चकल्या, शेव वगैरे असायचे. सकाळच्या नोकरीच्या घाईत असणारे अनेक जण पटापट पॅकेट उचलायचे. सकाळी ७ ला आलेले काका सकाळी १० वाजता दोन्ही पिशव्या घडी घालून गावाकडे परतायचे. महिलांना औद्योगिक प्रशिक्षण देऊन त्यांचे आर्थिक सबलीकरण करण्याच्या हेतून नोकरीनिमित्त काम केल्यावर त्या त्या संस्थांशी अजूनही जुळून काम करते आहे. अनेकदा महिला काहीतरी हाताला काम हवे म्हणून विचारायला येतात. पायलीचे अनेक काम खरतर आजही उपलब्ध असतात त्यासाठीचे प्रशिक्षण देखील मोफत असते; त्यात उदबत्ती बनवणे, खत तयार करणे, कागदाचे लिफाफे बनवून दुकानांना देणे, गृह उद्योग सारख्या अनेक गोष्टी असतात. मात्र प्रत्यक्ष काम करायची वेळ येते तेव्हा महिलांना अशी छोटीमोठी कामे करायला लाज वाटते. मला आठवतं आम्ही मुंबईला राहायचो तेव्हा भिजवलेली आणि मोड आलेली कडधान्ये बाजारात विकायला असायची. त्या विकणाऱ्या बायका अशी दहा भांडी मांडून दहा प्रकारची कडधान्ये विकायची. तिच्या शेजारी निवडलेल्या भाज्या घेऊन एक आजी बसायची. नोकरीपेशा बायकांना अशी आयती भिजवलेली मोड आलेली कडधान्ये, निवडलेल्या भाज्या, तोडलेल्या शेंगा, सोललेले वाटाणे, तूर दाणे, हरभरा मिळणार असतील तर त्या अनेकदा जास्तीचे पैसे द्यायलाही मागेपुढे पाहत नाही. अनेकींना हे करायचे सुचवले तेव्हा ''ही अशी कामे आम्ही करणार?'' असा अविर्भाव होता. कामाची पैशांची प्रचंड गरज आहे. मात्र काम करणार ते टेबलावर बसूनच उच्च पदाचेच असे अनेकींना वाटत असते, भलेही त्यासाठीची पात्रता त्यासाठी लागणारे स्किल आपण कधीच आत्मसात करण्याचा प्रयत्न केला नसेल. मागे आणखी एक किस्सा ऐकला होता, हायवेवर असणाऱ्या ढाब्यांना लागणारे सोललेले लसूण, आल्याचे लच्छे एकेक किलोचे पॅकेट तयार करून ग्रामीण भागातील काही महिला त्यांना पुरवत असे. किती सोपे आहे.. रोज एका हॉटेलला एक किलो. पाच-सहा हॉटेलला तेवढेच. केवळ लसूण सोलून द्यायचा हा व्यवहार आहे आणि त्याबदल्यात जी काही मेहनत लागेल त्याचे पैसे मिळेल.. कुणाला बरं जमणार नाही हा व्यवसाय. आमच्याकडे रोज एक भाजी विकणारा २२-२३ वर्षांचा चुणचुणीत उत्साही मुलगा येतो.. तो संध्याकाळी ठेलाभर सिजनल भाजी किंवा फळे (कोणतेही एकच) विकायला वेगवेगळ्या मोहोल्ल्यात फिरतो. त्याच्या कामाची यूएसपी म्हणजे तो त्याच्या ग्राहक असणाऱ्या महिलांशी अत्यंत आदराने, प्रेमाने आपुलकीने वागतो. सगळ्या त्याच्या ताई, वाहिनी, आत्या, मावशी झाल्या आहेत. कुठली वेगळी भाजी बाजारात आली की ''ले जाओ ना दीदी, तुमको पसंद है करके मै लाया खास, पैसे भी मत दो. तुम खाओगे तो मेरा पेट भरेंगा'' म्हणतो. कधी दोन काकड्या उचलून एखादीच्या पिशवीत घालतो. ''तुम्हारे लिये नही, ये मेरे भांजे के लिये दे रहा, उसको खिलाओ, धष्टपुष्ट बनाव'' म्हणतो. बायका चक्क दिवसभर त्याची वाट पाहतात पण दुसरीकडून भाजी घेत नाहीत. दिवसभरात त्याचा ठेला रिकामा होतो. शब्दांची किमया. नोकरी पाण्याविषयी बेरोजगार असल्याचे लोकं जेव्हा बोलतात आणि तुम्ही त्यांना काही पर्याय सुचवता तेव्हा ते न करण्याचे त्यांच्याकडे अनेक कारणं असतात. लोकांना निकामी बसणं आवडतं पण मिळालेले काम कधी अंतर दूर पडतं म्हणून, कधी बॅकऑफीसचेच काम हवे म्हणून, कधी एरिया चांगला नाहीये म्हणून, कधी वेळा सोयीच्या नाहीत म्हणून, कधी हाताशी गाडी नाही म्हणून गमावणे ते पसंत करतात पण कुठलीही लाज न बाळगता जरा जास्तीचे कष्ट घेऊन जे मिळेल त्या कामातून ज्ञान आणि अनुभव वाढवून घेऊन पुढे हवे ते मिळवण्यासाठी प्रयत्न करणारी माणसे खरंच विरळा असतात. तिचं आणि तेवढीच आयुष्यात काहीतरी करु शकतात. Rashmi Padwad Madankar
👍 ❤️ 👌 😮 11

Comments