
मराठी अपडेट्स - Marathi Updates
February 14, 2025 at 04:20 PM
Fact check:
गंगा जलावरील एक वैज्ञानिक निरीक्षण – डॉ. एस. आर. कामत यांचा अभ्यास
केईएम रुग्णालयातील सुप्रसिद्ध फुफ्फुसरोगतज्ज्ञ दिवंगत डॉ. एस. आर. कामत यांची एक अतिशय रोचक वैज्ञानिक नोंद आहे. त्यावेळी अलाहाबादमध्ये कुंभमेळा होणार असल्याने, त्यांनी गंगा जलाचा सूक्ष्मजैविक अभ्यास करण्याचा निर्णय घेतला.
कुंभमेळ्यात लाखो लोक गंगेत स्नान करतात, पण कोणालाही संसर्ग होत नाही! हे आश्चर्यकारक वास्तव पाहता, डॉ. कामत सरांनी वैज्ञानिक दृष्टीकोनातून गंगा जलाची तपासणी करण्याचे ठरवले.
त्यांनी एका व्यक्तीला निर्जंतुक बाटल्यांसह पाठवले आणि पाच वेगवेगळ्या ठिकाणांहून पाणी गोळा करण्याच्या सूचना दिल्या:
1. नदीच्या काठावरून
2. थोडेसे आत जाऊन
3. दुसऱ्या किनाऱ्यावरून
4. अगदी मध्यभागातून
5. सर्वात महत्त्वाचे – जिथे सर्वाधिक लोक स्नान करत होते त्या ठिकाणाहून
या पाच नमुन्यांपैकी एक संच मी बॅक्टेरियोलॉजिकल अभ्यासासाठी माझ्या प्रयोगशाळेत पाठवला, तर दुसरा संच हाफकिन संस्थेला बॅक्टेरियोलॉजी आणि व्हायरोलॉजी चाचणीसाठी दिला.
आणि निकाल थक्क करणारे होते!
➡ माझ्या प्रयोगशाळेतील पाचही नमुन्यांमध्ये कोणतीही जीवाणू (बॅक्टेरिया) आढळले नाहीत!
➡ हाफकिनला पाठवलेल्या पाचही नमुन्यांमध्येही कोणतेही बॅक्टेरिया नव्हते!
➡ मात्र, त्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर बॅक्टेरिओफेज (bacteriophages) आढळले!
बॅक्टेरिओफेज म्हणजे काय?
बॅक्टेरिओफेज हे बॅक्टेरियांना नष्ट करणारे विषाणू असतात. म्हणजेच, गंगेच्या पाण्यात संक्रमण करणारे बॅक्टेरिया वाढतच नाहीत, कारण त्यांना नष्ट करणारे बॅक्टेरिओफेज मोठ्या प्रमाणावर उपस्थित असतात!
हीच गंगाजलातील विलक्षण वैज्ञानिक बाब आहे.
यामुळेच लाखो लोक गंगेत स्नान करूनही आजवर कुंभमेळ्यात कोणताही साथीचा रोग पसरलेला दिसत नाही!
हे एक प्रत्यक्ष अनुभवलेले गंगाजलाचे अद्भुत वैज्ञानिक सत्य आहे!🌹🌹🪷🪷🌳🌳🌈🌈🚩🚩💪
https://www.facebook.com/share/p/19vmsBXugE/
खरी माहिती:
*गंगेच्या पाण्यातील बॅक्टेरियोफाज*
#understand_misinformation_drpriya 04
गेल्या आठवड्यात व्हाट्सअप वर एक मेसेज पसरला होता की पुण्यातल्या कुठल्या डॉक्टरांनी गंगेच्या पाण्याचे नमुने घेतले आणि त्याच्यामध्ये त्यांना बॅक्टेरिया ऐवजी बॅक्टेरियांना मारू शकणारे बॅक्टेरियोफाज सापडले.
माझ्या एका वाचक मैत्रिणीने मला हा मेसेज व्हाट्सअप वर पाठवला आणि विचारले हा खरा आहे का.
नंतर एका विज्ञानाच्या ग्रुपमध्ये देखील हा प्रश्न विचारला गेला.
आपण बहुदा बारावी मध्ये बॅक्टेरिओफाजबद्दल शिकलो होतो.
जिवाणूहुन देखील सूक्ष्म असे हे विषाणू असतात जे जिवाणूंना बाधित करून त्यांना मारू शकतात.
आपण विषाणूबद्दल असेही शिकलो होतो की विषाणूंना जगण्यासाठी कोणत्या ना कोणत्या सजीव पेशीची आवश्यकता असते अशा पेशींशिवाय स्वतंत्रपणे विषाणू फार कमी काळ जगू शकतात.
म्हणजेच बॅक्टेरिया शिवाय बॅक्टेरियोफाज आढळणे हे अतिशय दुर्मिळ व जवळजवळ अशक्य गोष्ट आहे.
निसर्गात जिथे जिथे खूप जास्त प्रमाणात बॅक्टेरिया असतात त्या त्या ठिकाणी अतिप्रचंड प्रमाणामध्ये बॅक्टेरिओफाज पण असतात.
आज त्यांच्या विषयी माहिती वाचताना अलीबाबाची गुहा उघडली आहे माझ्यासाठी आणि त्याबद्दल पुढची पोस्ट लिहिणार आहे.
इ कोलाय च्या जिवाणूला आठ तासात मारण्यासाठी प्रति जिवाणू 1,00,000 म्हणजे 10^5 bacteriophage आवश्यक असतात. जर 10^4 म्हणजे 10,000 बॅक्टेरिओफाज असतील तर एक जिवाणू नष्ट करायला त्यांना 72 तास लागतात. असे एका अभ्यासामध्ये सांगितलेले आहे. यावरून निसर्गामध्ये हे बॅक्टेरिओफाज किती मोठ्या प्रमाणामध्ये असतात हे आपल्या लक्षात येईल.
बॅक्टेरियोफाजच्या नैसर्गिक अधिवासामध्ये समुद्राचा उल्लेख आहे मात्र नदीचा उल्लेख एका पेपरमध्ये नव्हता. त्यामुळे गंगा नदीबद्दल काही पेपर आहे का याचा मी शोध घेतला. तेव्हा खाली स्क्रीन शॉट मध्ये दिलेला अभ्यास सापडला.
यामध्ये गंगेचे पाणी जिथे दूषित पाणी आहे व जिथे पाण्याच्या दूषितपणा कमी आहे अशा दोन्ही ठिकाणी बॅक्टेरिया आणि बॅक्टेरियोफाज यांचा अभ्यास करून एक पेपर प्रसिद्ध झाला आहे. दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या प्रजातीचे बॅक्टेरियोफाज सापडले आणि जे पाणी जास्त दूषित होते त्या ठिकाणी बॅक्टेरिओफासजचे प्रमाण देखील जास्त होते असे आढळले. ( पेपर पेड असल्याने संपूर्ण वाचता आला नाही)
मिसइन्फॉर्मेशन मध्ये एक प्रकार असा असतो, ज्यामध्ये विविध व्यक्तींची नावे वापरलेली असतात. या व्यक्ती शिकलेल्या किंवा आदरणीय असू शकतात. त्यामुळे ती माहिती सत्य असल्याचा भास होतो.
तसेच शास्त्रीय शब्द देखील वापरलेले असतात. मात्र त्यामध्ये दिलेली माहिती ही शास्त्राच्या कसोटीला तसेच आपल्याला जे मूलभूत नियम माहित आहेत त्या नियमांना धरून नसतात.
मात्र सर्वसामान्य जनता एवढा सखोल विचार करत नाही किंवा काही नवीन शास्त्रीय शब्द सर्वांना माहिती असतीलच असे नाही.
जर ही माहिती तुमच्या मनातील विश्वासाला ठामपणा देत असेल तर कन्फर्मेशन बायस अंतर्गत आपण चटकन विश्वास ठेवतो.
मिसइन्फॉर्मेशन येता जाता व अधिकाधिक सूक्ष्मपणे आपल्यापर्यंत पोहोचत आहे. ती ओळखण्याची आपल्या सर्वांची क्षमता वाढायला हवी आणि जिथे मिसइन्फॉर्मेशन दिसते , त्या ठिकाणी तिला थांबवायला हवे. अन्यथा काय खरे आणि काय खोटे हे काही काळाने समजणे बंद होऊन जाईल.
तुम्ही पण प्रॅक्टिस करताय ना मीसइन्फॉर्मेशन ओळखण्याची?
डॉ प्रिया प्रभू, मिरज
रोगप्रतिबंधक शास्त्र तज्ञ
(१२/२/२५)
❤️
👍
🙏
9