Vishal Pawar
Vishal Pawar
February 12, 2025 at 07:00 AM
काल सेन्सेक्स एक हजार अंशाने खाली आला. गेले काही दिवस खाली येतच आहे. अजून खाली जायची शक्यता आहे. कारण जे काही घडत आहे त्याची खोली आणि व्याप्ती बरीच आहे. आणि मुख्य म्हणजे हे तत्कालीन नाहीये. अनेक कारणे एकाच वेळी घडत आहेत. पहिले कारण; फक्त भारतासाठी नाही तर जगातील सर्वच शेअर मार्केट साठी. डोनाल्ड ट्रम्प आयतीवर निर्बंध घालतील अशी अटकळ होती पण पहिल्या दिवसापासून ते एवढी तलवारबाजी करतील असे वाटले नव्हते. त्यामुळे एकूणच जागतिक व्यापारात काळे ढग दाटून आले आहेत. कोणतेही शेअर मार्केट नेहमीच भविष्यवेधी असते. फॉरवर्ड लुकिंग. भविष्यकाळाबद्दल साशंकता निर्माण झाल्यावर शेअर मार्केट खाली येते. नेहमीच. ते घटना घडायची वाट बघत नाही. जे आता सर्वच देशांत घडत आहे. दुसरे कारण भारतामध्ये डॉलर रुपया विनिमय दर घसरत आहे. परकीय गुंतवणूकदार संस्था गेले काही महिने भारतातून गुंतवणूकी काढून घेत आहेत. रुपया घसरल्यामुळे त्याला अधिक वेग आला आहे. कारण त्यामुळे परकीय गुंतवणूकदारांचा डॉलर मधील रेट ऑफ रिटर्न कमी होतो. जानेवारी मध्ये ८७,००० कोटी आणि फेब्रुवारी मध्ये १२,००० कोटी शेअरची विक्री त्यांनी केली आहे. तिसरे कारण भारतीय मोठ्या कंपन्यांचा डिसेंबर २०२४ संपलेल्या तिमाहीचे रिझल्ट्स येण्याची सुरुवात झाली आहे. ते काही फार आशादायी चित्र रंगवणार नाहीत असे बोलले जात आहे. ____________________ प्रश्न असा विचारावयासावा की सेंसेक्स कोसळल्यानंतर संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्थेवर का काळे ढग यावेत ? हा प्रॉब्लेम सेन्सेक्सचा नाही. सेन्सेक्सला नको तेव्हढे डोक्यावर बसवण्याचा आहे. गेली अनेक वर्षे बघा आमची अर्थव्यवस्था किती उर्जितावस्थेमध्ये आहे हे सांगण्यासाठी पुरावा काय देतात? तर बघा आमचा सेन्सेक्स किती वाढत चालला आहे. आता आता तोच पुरावा उलटा अंगावर येऊ लागला आहे. सेन्सेक्स कोसळत असेल म्हणजे अर्थव्यवस्था देखील कोसळणार अशी भावना, सेंटिमेंट तयार होऊ शकते ___________________ खर तर भारतीय अर्थव्यवस्थेत नॉन कॉर्पोरेट क्षेत्र ( उदाहरणार्थ शेती जमिनीशी निगडित, एम एस एम इ, स्वयंरोजगार, अनौपचारिक क्षेत्र) खूप मोठे आहे. नोंदणीकृत कंपन्यांची संख्या प्रचंड आहे पण स्टॉक मार्केट वर ट्रेड होणाऱ्या आहेत फक्त काही शे. तांत्रिक दृष्ट्या बोलायचे तर सेन्सेक्स वर गेला किंवा खाली गेला तर वरील नॉन कॉर्पोरेट आणि लिस्टेड नसलेल्या कंपन्यांवर काही परीणाम होता कामा नये. पण धोरण कर्त्यानी भारतीय शेअर बाजार भारतीय अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी आणून बसवला आहे. केंद्र कोसळले की अर्थव्यवस्थेचे सारे चक्र कोसळते शेअर बाजार असू दे. पण तो चक्राच्या केंद्रस्थानी नको. तो कुठेतरी केंद्र आणि परिघाच्या मध्ये असावयास हवा. शेअर मार्केट म्हणजे अर्थव्यवस्था; सेन्सेक्स=भारतीय अर्थव्यवस्था =सर्वच नागरिकांचे भले. ही समीकरणे बाद केली पाहिजेत. अर्थव्यवस्थेची संरचना तशी असेल तरच जागतिक पातळीवर होणारी वादळे भारतीय किनाऱ्यांपर्यंत थोपवली जाऊ शकतात. संजीव चांदोरकर (१२ फेब्रुवारी २०२५) https://www.facebook.com/share/1EWnJW3vk4/

Comments