मराठा मीडिया महा-मिशन महाराष्ट्र
June 11, 2025 at 07:46 AM
बच्चूभाऊंचा अन्नत्याग,
सरकारला जमालगोटा
---------------------
https://www.facebook.com/share/p/19gASrZ3sD/
==============
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मेंढपाळ, बेघर, कामगार इत्यादी असंघटीतांच्या प्रश्नावर गुरूकुंज मोझरी येथे रविवारपासून (ता. आठ जून) अन्नत्याग आंदोलन सुरू केलेले आहे. सरकारने एकतर मागण्या मंजूर कराव्यात, अन्यथा आमच्या अंत्यसंस्काराची तयारी करावी, या परखड शब्दात सरकारला इशारा दिलेला आहे. बच्चूभाऊ कडू यांच्या अन्यत्याग आंदोलनाची दखल सरकारला घ्यावीच लागेल. अन्यथा सरकारचीच अंत्ययात्रा निघणे अटळ आहे.
सरकारकडून शेतकर्यांच्या डोक्यात जात पेरली जात आहे. शेतकरी वेगवेगळ्या पक्षात विखुरलेले गेलेले आहेत. म्हणूनच शेतमालाला भाव मिळत नाही, तरी शेतकरी बोलत नाही, हे बच्चू कडू यांचे विधान त्यांच्या लढ्याचे उद्दीष्ट सांगणारे आहे. शेतकर्यांचे पंचप्राण शरद जोशी यांच्या निर्वाणानंतर राज्यातील शेतकरी सैरभैर झालेला आहे. शेतकरी नेतृत्वाची पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न विविध भागातील नेते आपापल्या परिने करीत आहेत. मात्र त्यांच्या प्रयत्नांना पाहिजे तो प्रतिसाद शेतकर्यांकडून अद्यापपर्यत मिळालेला नाही. त्याचे कारण विश्वाहार्यता आहे. "मै नही झुकेंगा", यावर अटल राहत बच्चू कडू यांनी सुरूवातीपासून शेतकरी व दिव्यांगांचा कैवार घेतलेला आहे. राज्यमंत्री असताना शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ त्यांनी दिल्लीपर्यंत रॅलीद्वारे धडक दिली होती. त्यांच्यात ती विश्वासहार्यता शेतकऱ्यांना दिसत आहे. ते वर्षानुवर्षापासून शेतकर्यांच्या प्रश्नावर लढत आहेत. त्यांनी कित्येकदा सभागृह दणाणून सोडलेले आहे. सरकारला वेळोवेळी त्यांच्या मागण्यांपुढे झुकावे लागलेले आहे. दिव्यांगासाठी मंत्रालय ही त्याचीच फलश्रृती आहे. निवडणुकीदरम्यान सरकारने कर्जमाफीचे दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठीची मागणी बच्चूभाऊ कडू यांनी आता रेटून धरलेली आहे.
सरकार कोणाचेही असो, ते गेंड्याच्या कातडीचे असते. सरकारी यंत्रणा ही हत्तीसारखी बसलेली असते. तिला वारंवार हलवावे लागते. एवढे करूनही ती कासवगतीने चालते. बच्चू कडू हे गुवाहाटी प्रवासानंतर गठीत झालेल्या सरकारचा एक भाग राहिलेले आहे. त्या "कल्चर"चा कारभार कसा चालतो, हा त्यांनीसुद्धा जवळून अनुभवलेला आहे. ज्यांच्या हातात सत्ता असते, आधी ते ‘आपलं काय’, हे बघत असतात. जनतेचे प्रश्न कितीही गंभीर असो, त्यांच्यासाठी जीवनमरणाचे असोत, त्याकडे लक्ष देण्यास सरकारला सवड नसते. जनता निवेदन देऊन, मोर्चे काढून, आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत असते, पण शासन-प्रशासन त्याचे गांभीर्य लक्षात घेत नाही. जेव्हा उद्रेक व्हायला लागतो, जनमत विरोधात जायला लागते, सरकारी यंत्रणेच्या पायाखालची वाळू सरकायला लागते, तेव्हा कर्तव्यावरून सरकलेले सरकार जागेवर येण्याचा प्रयत्न करीत असते. याहीवेळी सरकारला गुरूकुंजात गुडघे टेकवावे लागतील. अप्रतिष्ठा म्हणून नाही तर लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न समजून सरकारला झुकावे लागणार आहे.
बच्चू कडे हे त्यांच्या अनोख्या आंदोलनांसाठी राज्यभर प्रसिद्ध आहेत. यापूर्वी त्यांनी नागपूरात "शोले स्टाईल" आंदोलन केले, तेव्हा तत्कालिन गृहमंत्री आर. आर. आबा पाटील यांना जलकुंभाच्या शेकडो पायर्या चढून बच्चू कडू यांची मागणी समजून घ्यावी लागली होती. तत्कालिन वित्त व नियोजन राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख पाण्याच्या टाकीवरील त्या चर्चेचे साक्षीदार आहेत. आता बच्चूभाऊ कडू यांनी शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मेंढपाळ, बेघर, कामगार या असंघटीत क्षेत्रातील सर्वसामान्यांच्या प्रश्नावर सरकारविरोधात नियोजनपूर्वक निर्णायक लढा उभारलेला आहे. त्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावलेली आहे. अन्ना हजारे यांच्या आंदोलनासारखी या आंदोलनाची ते दुर्दशा निश्चितच होऊ देणार नाही. त्यासाठी त्यांचे असंख्य कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत.
बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ त्यांचे असंख्य ‘धनाजी-संताजी’ विश्रोळीच्या धरणात जलसमाधीसाठी उतरलेले आहेत. चांदूरबाजार येथे मुंडन व बुधवारपासून चुलबंद आंदोलन होत आहे. एवढच नव्हे तर राष्ट्रीय शेतकरी नेते राकेश टिकैत गुरूकुंज मोझरीत डेरेदाखल झालेले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी, रविकांत तुपकर, आमदार रोहित पवार, आमदार गजानन लवटे, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, आमदार नितीन बापू देशमुख, विश्वजित कदम, प्रकाशदादा सोळंके, लक्ष्मण हाके, मनोज जरांगे, यांनी बच्चू कडू यांच्या आंदोलनास पाठींबा दिलेला आहे. त्यापैकी कित्येक नेते स्वतः पाठींबा देण्यासाठी गुरूकुंज मोझरीत येत आहेत. त्याशिवाय अन्य नेते भेटीला येण्याचा व आंदोलनाला पाठिंबा देण्याचा ‘सिलसिला’ हा आंदोलनाची सांगता होईपर्यंत चालत राहणार आहे.
निवडणुकीच्या तोंडावर महिलांना लाडक्या बहिणी संबोधून त्यांना महिन्याकाठी दीड हजार रुपये देऊन उदारपणा दाखविणार्या सरकारकडे शेतकर्यांचे कर्ज फेडण्यासाठी किंवा असंघटीतांचे प्रश्न सोडविण्यासाठी पैसे नाही, असे होऊ शकत नाही. उद्धव सरकारने यापूर्वी शेतकर्यांची कर्जमाफी केली होती, एवढेच नव्हे तर शेतकर्यांकडे असलेले नोंदणीकृत सावकारांचे कर्ज देखील फेडले होते. लोकसभेत हादरा बसल्यानंतर विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना सरकारने वार्षिक 30 ते 35 हजार कोटींची लाडकी बहिण योजना आणली, त्याचदरम्यान शेतकर्यांची कर्जमाफी करून असेही आश्वासन दिले होते. आता त्या आश्वासनाची पूर्तता व्हावी, एवढेच बच्चू कडू यांचे या आंदोलनाच्या माध्यमातून म्हणणे आहे. ते गैर कसे होऊ शकते? शेतकर्यांची कर्जमाफी करू, हे आश्वासन कोणी दिले होते, असाही प्रश्न दस्तुरखुद्द सत्ताधार्यांनीच उपस्थित केलेला आहे. एकवेळ तसे आश्वासन कुणी दिलेले नसले तरी ती एक मोठया सर्वसामान्य वर्गाची मागणी आहे, हे सरकारला विसरून चालणार नाही.
बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन हा असंघटीतांचा, संघटीतांच्या सरकारवर मोठा प्रहार आहे. सरकारसाठी मोठा जमालगोटा आहे. सरकारला रक्षात्मक मोडवर येण्याशिवाय पर्याय नाही. आंदोलनाची भूमि असलेल्या जिल्ह्यात आणि जीवनाची मार्गदर्शक तत्त्व देणार्या राष्ट्रसंतांच्या भूमित हे आंदोलन होत आहे. दिल्लीतील अरविंद केजरीवाल, अण्णा हजारे यांचे अथवा शेतकरी आंदोलन चिरडून काढण्याऐवढं हे आंदोलन सरकारसाठी सोपे नाही. एक तर मागण्या मान्य करा, नाहीतर... माझ्या अंत्ययात्रेची तयारी करा, असे बच्चू कडू यांनी आंदोलन सुरू करताना स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे आता सरकारपुढेसुद्धा "करो या मरो", याशिवाय पर्याय राहिलेला नाही. बच्चू कडू यांची अंत्ययात्रा निघणार नाहीच आणि सरकारला ती काढणे परवडणार पण नाही. जर अशी वेळ आली तर सरकारची अंत्ययात्रा राज्यातून निघाल्याशिवाय राहणार नाही. सरकारने बच्चू कडू यांचा अवतार बघावा, त्यांच्या चेहर्याचा बदललेला लूक बघावा, केशरचना बघावी, तो वरून वैराग्यत्वाकडे जाण्यासारखा दिसत असला तरी त्यात ज्वालामुखी दडलेला आहे की नाही, याची खातरजमा करावी. जागो सरकार जागो!
-गोपाल हरणे
9422855496
अमरावती.
=================
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
🙏
1