शेतकरी ई प्लॅटफॉर्म
शेतकरी ई प्लॅटफॉर्म
June 4, 2025 at 04:10 AM
*शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी* नांदेड दि. ३ जून :- पेरणीचा हंगाम उंबरठ्यावर आहे. शेतकऱ्यांनी आता योग्य बियाणांची निवड आणि त्यावर बीजप्रक्रिया करण्याकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे. रोगट बियाणांमुळे शेतकरी संकटात सापडतात आणि उत्पादनावर परिणाम होतो. योग्य बीजप्रक्रिया आणि उगवण क्षमतेची खात्री झाल्यास पेरणीनंतरचा नुकसानीचा धोका मोठ्या प्रमाणावर टळतो. तसेच दर्जेदार उत्पादन मिळण्याची शक्यता वाढते. बियाणांची उगवण क्षमता तपासण्याची प्रक्रिया अत्यंत सुलभ आहे. बियाणांच्या साठ्यातून सुमारे १०० दाणे निवडून त्यांची उगम चाचणी करावी. त्यासाठी मातीचा ट्रे, गोणपाठ किंवा टिशूपेपर वापरता येतो. ५ ते ७ दिवसांत किती दाण्यांतून कोंब फुटले यावरून उगवण क्षमता समजते. किमान ७० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त उगम दिसल्यास ते बियाणे वापरण्यायोग्य ठरते. बियाणांवर योग्य प्रक्रिया न केल्यास उगम दर कमी होतो आणि उत्पादनात मोठी घट होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करून घ्यावी. बीजप्रक्रिया केल्यामुळे बियाण्यापासून प्रसारित होणाऱ्या आणि जमिनीत असणाऱ्या बुरशीजन्य रोगापासून संरक्षण मिळते. जमिनीत असणाऱ्या किडींचा तसेच पेरणी पासून ३०-३५ दिवस रस शोषक किडी आणि खोड माशी यांचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत होते. कीड व रोग व्यवस्थापनेच्या खर्चात बचत होते. बियाण्याची उगवण क्षमता वाढवते. जैविक खताच्या प्रक्रियेमुळे जिवाणू झाडांना/पिकांना अन्नद्रव्य लवकर उपलब्ध करून देतात. त्यामुळे झांडाची/पिकांची वाढ जोमाने होते. उत्पादनात वाढ होते. बीजप्रक्रिया करण्यासाठी हातमोजे, मास्क, चष्मा या सारख्या व इतर संरक्षण करणाऱ्या बाबीचा वापर करावा. बीजप्रक्रिया तळवटावर किंवा बारदाण्यार किंवा सीड ड्रम/यंत्राद्वारे सावलीत करावी. बियाणे हाताने चोळू नये, कापडाने किवा पिशवी मध्ये एकत्र मिसळून घ्यावे. रासायनिक आणि जैविक बीजप्रक्रिया एकत्र करू नयेत. बीजप्रक्रिया केलेले बियाणे ३-४ तासाच्या आत पेरणी साठी वापरावे. बीजप्रक्रिया बुरशीनाशक-किटकनाशक-जीवाणू अशा क्रमाने करावी.

Comments