मराठी अपडेट्स - Marathi Updates
मराठी अपडेट्स - Marathi Updates
June 3, 2025 at 11:48 AM
*रिॲलिटी शो...कलेचा भेसूर बाजार...* (हाय प्रोफाईल बालमजुरी..) (लेख आवडला असेल तर फेसबुकवर फक्त शेअर करू शकता. फेसबुकवर कॉपी-पेस्ट करायला परवानगी नाही. फक्त व्हाट्सॲपवर कॉपी-पेस्ट करू शकता.) ©*अमृता खंडेराव.* रियालिटी शो हा शब्द लहानपणी आम्हाला माहीत नव्हता. जेव्हा रियालिटी शो यायला लागले त्यावेळी सुरुवातीला त्याबद्दल खूप उत्सुकता आणि कौतुक वाटत होते. काहीतरी रियल पाहायला मिळणार याचे कुतुहल वाटत होते. गायन, नृत्य, धाडस, वन मिनीट चॅलेंज, अद्भुत करामती यातील कौशल्ये दाखवणार्‍या वेगवेगळ्या शोचे पुढे जोरदार पीक आले. लवकरच त्यातले नाविन्य संपले. अभिजातता तर सुरुवातीपासूनच त्यात खूप कमी होती. भारतभरातले काही खरोखर अभिजात कलावंत त्यात पाहायला मिळाले पण नंतर ते पुन्हा दृष्टीआड गेले. त्यांना यातून फार मोठे यश मिळू शकले नाही. सोशल मीडिया आल्यानंतर तर वेगवेगळ्या शोमधले तुकडे सगळीकडे भराभर व्हायरल होऊ लागले. अनेकदा ते जाणीवपूर्वक व्हायरल केले गेले. लोकांच्या माथी मारले गेले. इच्छा असो की नसो, स्क्रोल करताना ते समोर येऊ लागले आणि मोठ्या प्रमाणावर पाहिले गेले. दर्जाहीन कार्यक्रमांची मोठी लाट आली. अभिरूची हरवली आणि स्वस्त मनोरंजनाची चलती सुरू झाली. रियालिटी शोमध्ये मेलोड्रामा खच्चून भरला गेला. प्रत्येक कलावंतासोबत एक स्टोरी जोडायची फॅशन पुढे आली. एखादा चांगला कलावंत आहे म्हणून नव्हे, तर त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी अत्यंत गरिबीची आहे म्हणून त्याच्याबद्दल सहानुभूती निर्माण केली गेली. आणि या टचकन् डोळ्यात पाणी आणणाऱ्या मेलोड्रामा स्टोर्‍या लोकप्रिय बनवल्या गेल्या. ज्यांच्याकडे कलेसोबत जोडायला स्टोरी नाही असे अनेक गुणी कलावंत बाजूला पडले. अनेकदा कृत्रिम स्टोरीज बनवल्या गेल्या. उकरून काढून कंटेंट शोधला गेला. तीन खुर्च्यांमध्ये बसलेले तीन परीक्षक आणि अधून-मधून गेस्ट परीक्षक आणणे, सादरीकरण सुरू असताना त्यांनी भावविव्हळ एक्सप्रेशन देणे, एकमेकांकडे जखमी हृदयाने पाहणे, स्टॅंडिंग ओव्हिएशन देणे, स्टेजवरच्या नवोदित कलावंताकडे पळत जाऊन त्याला सद्गदित मिठी मारणे, येन केन प्रकारे प्रेक्षकांना भावूक करून सोडणे असले चमत्कारिक धंदे सुरू झाले. भीक नको पण कुत्रं आवर अशी रियालिटी शोची अवस्था करून सोडली गेली. स्टेजवर आलेल्या चिमुकल्या कलावंताला साष्टांग दंडवत घालणे, उचलून कडेवर घेणे "क्या यार! तुम बहुत ग्रेट हो.." असे म्हणणे. दाद देण्यासाठी एखादे नवीन फंडावाक्य तयार करणे या भानगडीत रियालिटी कुठेतरी हरवून गेली. पुढे पुढे लोकांना याची इतकी सवय झाली की आता पुढे काय घडणार याचा आधीच अंदाज येऊ लागला. सहभागी विद्यार्थ्यांच्या डोक्यावर 'यशस्वी झालंच पाहिजे..' अशा अपेक्षांचं ओझं टाकलं जाऊ लागलं. चमकदार कपडे, झगझगीत लायटिंग, फिरते कँमेरे, असल्या नेत्रदीपक झगमगाटाबरोबर लवकरच पुरस्कार मॅनेज करण्याचे प्रकार सुरू झाले. पब्लिक वोटिंग सुरू केले गेले. शोचा टीआरपी वाढविण्यासाठी लहान लेकरांना भिक मागितल्यासारखी मते मागायला लावली गेली. पब्लिक वोटिंग मधून आपल्या मुलाला पुढे आणण्यासाठी इकडे त्याचे आई-बाप आणि नातेवाईक दारोदार भिक मागू लागले. सहा महिन्यासाठी करार करून शाळा बुडवून विद्यार्थ्यांना शोच्या ठिकाणी राहणे कंपल्सरी केले. कलेच्या नावाखाली बालकामगार बनवून त्यांचे शोषण केले गेले. नाव आणि पैसा मिळविण्यासाठी पालक आणि शैक्षणिक संस्था याला बळी पडल्या. सहा महिने अभ्यास बुडाल्यामुळे मुलांची अवस्था बिकट झाली. शाळेपासून दूर राहिल्यामुळे त्यांना चमक-दमकची चटक लागली. परंतु प्रसिद्धीसाठी हपापलेल्या चॅनल किंवा पालकांना याचा विचार करायला सवड नाही. या शोमधून कोवळी लेकरे हिडीस गाणी गाऊ लागली. उत्तान हालचाली करत, देह उडवत, बेतालपणे नाचू लागली आणि लोक टाळ्या वाजवू लागले. शुद्ध कला, रियाझ, कलेची उपासना, आराधना, बालमानसशास्त्र सगळे काही वेशीवर टांगले गेले. फक्त व्यावसायिक चॅनल चालविण्यासाठी सुरू झालेल्या रियालिटी शोच्या नावाखाली मांडलेल्या या कलेच्या भेसूर बाजाराला जबाबदार कोण? *अमृता खंडेराव.*
Image from मराठी अपडेट्स - Marathi Updates: *रिॲलिटी शो...कलेचा भेसूर बाजार...* (हाय प्रोफाईल बालमजुरी..) (लेख आवड...
👍 💯 ❤️ 14

Comments