
खडकवासल्याचा कोलंबस
54 subscribers
About खडकवासल्याचा कोलंबस
"पर्यटन् पृथिवीं सर्वां, गुणान्वेषणतत्पर कोलंबस:" गुणांच्या शोधत तत्पर असलेला कोलंबस सकल पृथ्वीचे भ्रमण करत आहे.
Similar Channels
Swipe to see more
Posts

**किस्से कोलंबसचे..** एकदा असंच कट्ट्यावर बसलेलो असताना मी सहज म्हणून टाकलं, "चला ट्रेकिंगला जाऊया!" आणि नेहमीसारखं झालं. चौदा जणांपैकी बारा जणांनी नाक मुरडलं, मान वळवली आणि त्यांच्या चेहऱ्यावर "कशाला आता त्रास?" असा भाव. पण दोघे जण – खरं सांगायचं तर वाघाचे बछडे – तयार झाले. मग आम्ही तिघे ठरवलं, जाऊया ट्रेकला, आत्ताच! कुठे जायचं, कसं जायचं याचा पत्ता नव्हता. पण वयच तसं होतं – निर्णय पक्का झाला आमच्या एका मित्राकडे ‘सांगाती सह्याद्रीचा’ हे पुस्तक होतं. त्याचं कपाट उघडलं, त्याला न सांगता पुस्तक बॅगेत टाकलं, दोन हाफ पँट्स, दोन टी-शर्ट्स, कोलगेट आणि ब्रश टाकलं आणि बस स्टँडकडे पाय वळवले. बस स्टँड गाठेपर्यंत आम्ही ठरवलं फलटणच्या जवळचा वारुगड किल्ला. कसा आहे? माहिती नाही. वरती काय आहे? कल्पनाच नाही. पण मुक्काम तिथेच करायचाय, हे ठाम. बसने फलटण आणि तिथून टमटम करून एका गावात पोहोचलो. साधारण पाच वाजता चालायला सुरुवात केली आणि सात वाजेपर्यंत वर पोहोचलो. तिथं पोहोचल्यावर लक्षात आलं की समोर एक उंच कडा आहे आणि आम्ही चुकीच्या बाजूने वर आलो आहोत. आता उतरायला लागणार. अर्ध्या-पाऊण तासात परत उतरलो. एक मित्र म्हणाला, "इथंच झोपूया का?" पण आजूबाजूचं गवत माणसाच्या उंचीएवढं होतं. म्हणालो, "इथं झोपलो तर सकाळपर्यंत उठणं कठीण आहे." मग गावाकडे परत निघालो. गाव साधंसंच. आम्ही कॉलेजची पोरं, एका टपरीवर चहा घेत बसलो होतो. धुळवडीचा दिवस होता. गावात एक तरुण नेता – दादा – कार्यकर्त्यांसोबत उभा. त्याच्या हालचालींवरून वाटत होतं, त्यांची धुळवड साजरी करायला सुरुवात झालीय. त्याने आम्हाला बोलावलं. कारण? अंधार पडलेला, गावात अनोळखी तिघं पोरं – चौकशी आलीच. नाव विचारलं. एका मित्राच्या अंगात खोटं बोलण्याचा किडा वळवळला. त्याने स्वतःचं खोटं नाव सांगितलं, दुसऱ्याचंही सांगितलं. माझं नाव विचारणार इतक्यात मी खरं नाव सांगून टाकलं. आम्ही सुटलो असं वाटलं, तेवढ्यात प्रश्न – “आयडेंटी कार्ड दाखवा.” दोघांचं कार्ड दाखवणं शक्य नव्हतं. मी रागाने मित्राकडे पाहत माझं आयडेंटिटी कार्ड काढलं आणि दादांच्या हातात दिलं. त्यांनी नाव वाचलं, डोळे वर करून विचारलं, “इकडे कशाला आलाय?” दुसऱ्या मित्राच्या किड्याला परत जाग आली – म्हणाला, “आम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग शिकतो. जुनं कन्स्ट्रक्शन आणि आर्किटेक्चर अभ्यासतो. वारुगड किल्ला अभ्यासासाठी निवडला.” तेवढ्यात दादांचं लक्ष कार्डवर. “यात तर तुमची ब्रँच मेकॅनिकल दिसते” माझ्या शिट्ट्या वाजल्या. मी म्हणालो, “फर्स्ट इयरला मेकॅनिकल होतो, आता सेकंडपासून सिव्हिल घेतलंय” मी पटापट बोलून टाकलं आणि सुटकेचा निःश्वास टाकला पण दादांचं समाधान काही होत नव्हतं. “तुम्ही तिघंच कसे आलात?” – प्रश्न मागोमाग प्रश्न. मी आता गप्प बसलो, चेहऱ्यावर स्पष्ट लिहिलं होतं – “हे उत्तर तुझं.” मित्राने अंगभूत खोटं बोलण्याचं कौशल्य वापरलं – म्हणाला, "प्रत्येकाने वेगवेगळ्या जागा निवडल्या होत्या, आम्ही वारुगड निवडलं." एवढं बोलून त्याने ‘अरे वाह’ असा चेहरा केला. आणि त्याच्या अभिनयावर आम्ही फिदा झालो असतानाच दादा म्हणाले, “तुमच्या सरांना फोन लावा.” आता मात्र सगळ्या नाटकाचा शेवट होणार होता असं वाटलं. मी दादाला समजावण्याचा प्रयत्न करत होतो – “आयकार्ड दाखवलंय, आम्ही खरंच अभ्यासासाठी आलोय.” आणि तेवढ्यात एका बाजूने आवाज आला – “हा घ्या फोन, सरांना लावलाय.” मी खूप प्रश्नार्थक नजरेने मित्राकडे बघू लागलो – कोणता सर? कुठला फोन? काय चाललंय? पाच-सात मिनिटं माझा आणि दादांचा वाद चालू असताना, या हरामखोर मित्राने एका मित्राचा नंबर सरांच्या नावाने सेव्ह करून त्याला सिच्युएशन समजावून फोन केला होता. आणि तो ‘सर’ बनून तयारही झाला होता. इतका सफाईदार अभिनय, आवाजात तोल, विश्वासार्हता – दादा समाधानाने मानेने होकार देत होते. हे सगळं इतकं अविश्वसनीय झालं होतं की आता आम्ही त्या प्रसंगाची मजा घेऊ लागलो. एखादी चूक झाली असती तर इतका मार खायला लागला असता की गावात डॉक्टर सापडणंही कठीण होत . बाजूला एक वृद्ध व्यक्ती हे सगळं शांतपणे पाहत होते. लोकांच्या चेहऱ्यावरचा त्यांच्याबद्दलचा आदर स्पष्ट जाणवत होता. त्यांनी हस्तक्षेप केला. दादावर चढून बोलले – “काय त्रास देतोस पोरांना? चोर वाटतात का?” दादा गप्प झाले. नंतर समजलं – ते दादांचे वडील आणि गावचे माजी सरपंच होते. “कुठे जाणार आता?” – त्यांनी विचारलं. मी सांगितलं, “शेजारचं देऊळ दिसतंय, तिथं झोपू का?” ते म्हणाले, “हे गाव आहे. अर्ध्या तासात चिटपाखरू दिसणार नाही. आज धुळवडीचा दिवस – काहीतरी उलटं पालटं झालं तर? चला माझ्या घरी चला.” आणि आम्हाला त्यांच्या बोलेरोमध्ये बसवलं. गाडी रानातल्या वाटेने पुढे निघाली. अंधार होता. समोर एक व्यक्ती सायकलवरून चालला होता. खूप वेळ हॉर्न वाजवूनही बाजूला होत नव्हता. ते म्हणाले, “हा आमचा नोकर दिसतोय.” आणि ड्रायव्हरला थांबायला सांगितलं. मग म्हणाले, “जाऊ दे, धुळवड साजरी करून आला आहे. एवढं पिऊनही सायकल नीट चालवतोय बघ!” आम्ही त्यांच्या बंगल्यावर पोहोचलो. सायकलस्वार महाशय उतरले आणि दोन पावलं टाकताच धाडकन कोसळले. आम्ही सगळे हसायला लागलो. एवढा वेळ अंधारात न अडखळता न पडता सायकल चालवणारा – हा तोच? आम्ही त्याला उचलून पडवीत ठेवला. त्याची समाधी लागली होती. आम्ही आता झोपायच्या तयारीत होतो. ड्रायव्हरने सतरंज्या आणून दिल्या. मला आम्हाला एका कोपऱ्यात झोपायचं सांगितलं – तो गोठा होता. गाई-म्हशी आणि आम्ही. एकत्र. रात्रीचे बारा वाजले होते गाई म्हशींच्या सानिध्यात गोठ्यात पावसाच्या दिवसातही खूप चांगलं वाटत होतं. आपल्याबरोबर काय झाले आणि आपण काय कांड केला हे एकमेकांशी बोलत आम्ही गप्पा मारत होतो तेवढ्यात एकदम मित्राच्या लक्षात आले आपण आल्यापासून एक कुत्रा सतत भुंकत होता. रात्री बारा वाजता मित्र उठला, कुत्र्याला बिस्किट दिलं, टॉयलेटला गेला आणि कुत्र्याला बाहेर ठेवून गेट बंद करून परत आला. मी म्हणालो अरे नालायका त्यांनी आपल्याला राहायला जागा दिली आणि तो त्यांचा कुत्र बाहेर सोडून आलास? इतकं कृतघ्नपण? तो फक्त हसला. आता मी काहीच म्हणत नव्हतो. जे घडत होतं ते मी फक्त एन्जॉय करत होतो. सकाळी उठून शेतातल्या पाईपलाईनवर आंघोळ केली. गावाकडचे गरमागरम पोहे नाश्त्याला मिळाले. रात्रीचे सायकलस्वार महाशय पोहे घेऊन आले. त्यांचा चेहरा पाहिला आणि आम्ही पुन्हा हसलो. आणि मग निघालो.पुन्हा वारुगडकडे..पुढे काय झालं? तो किस्सा लवकरच....