
Think Maharashtra थिंक महाराष्ट्र
199 subscribers
About Think Maharashtra थिंक महाराष्ट्र
ग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. (तुम्ही www.thinkmaharashtra.com या लिंकवरून ते पाहू शकाल.) इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे. - टिम 'थिंक महाराष्ट्र' [email protected] 9892611767
Similar Channels
Swipe to see more
Posts

नागपूरचा ‘अजब बंगला’ म्हणजे नागपूरचे मध्यवर्ती संग्रहालय. त्या म्युझियमची स्थापना इंग्रज सरकारने 1863 मध्ये केली. ते भारतातील व महाराष्ट्रातील सर्वात जुन्या संग्रहालयांमध्ये गणले जाते. नागपूर शहर हे त्यावेळी मध्यप्रांत आणि वऱ्हाड यांची (Central Province And Berar) राजधानी होती. संग्रहालयात दहा दालने आहेत. त्यांत विविध प्रकारचे पुरावशेष, झाडांचे जीवाश्म, शिल्पे, चित्रे, भुसा भरलेले प्राणी, शिलालेख अशा अनेकविध वस्तू आहेत. सध्या संग्रहालयात 'शिवशस्त्र शौर्यगाथा' या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ते प्रदर्शन पर्यटकांसाठी फेब्रुवारी ते सप्टेंबरपर्यत खुले असणार आहे. त्यामध्ये नवे शिल्प दालन, अभिलेख दालन व मराठाकालीन शस्त्रांचे दालन पाहता येणार आहे. तसेच, तेथे जागतिक वारसा यादीत नामांकनासाठी प्रस्तावित बारा किल्ल्यांची माहितीही प्रदर्शित करण्यात आलेली आहे... संपूर्ण लेख - https://thinkmaharashtra.com/central-museum-of-nagpur/

वाचण्यास सोयीचे म्हणून मूळ प्रत पाठवत आहे - *डॉ.विनोद करकरे यांचा उत्कंठा भाव !* ‘पैसा नव्हे, कीर्ती मिळो द्यावी’ असे घोषवाक्य व्हिजिट कार्डावर छापणारे तज्ज्ञ, ज्येष्ठ डॉक्टर विनोद करकरे यांचे कार्डावरील दुसरे वाक्य आहे, ‘रिपोर्ट नव्हे, रोगी तपासावा !’ अशी कालविसंगत मनोधारणा असलेले करकरे चेंबूरला श्री नावाचे हॉस्पिटल गेली चार दशके यशस्वीपणे चालवत आहेत. ते स्वतः शस्त्रक्रिया करतातच, पण ‘रुग्णसेवा’ म्हणून तेवीस डॉक्टरांना वेगवेगळ्या रोगांवर उपचार करण्यासाठी जागा उपलब्ध करून देतात. डॉक्टराने रोग्याला बरे होऊ द्यावे- शक्यतो त्याला तपासण्या-शस्त्रक्रिया यांत अडकावू नये अशी करकरे यांची धारणा दिसते. करकरे स्वतः डॉक्टर जिद्दीने झाले- पंचविसाव्या वर्षी त्यांना पदव्युत्तर एम एस ही पदवी मिळाली. त्यापलीकडील डॉक्टरी तज्ज्ञतेच्या मुंबई-दिल्लीच्या अनेकविध पदव्या त्यांच्याकडे आहेत. पण तो इतिहास झाला. त्यांनी डॉक्टर होताच बाँबे पोर्ट ट्रस्ट रुग्णालयात नोकरी आठ वर्षे केली. त्यांनी विविध प्रकारच्या शेकडो शस्त्रक्रिया केल्या आहेत. मात्र ते तज्ज्ञ ऑर्थोपेडिक विभागातील मानले जातात आणि तरीही ते आग्रहाने सांगतात, की रुग्णाची शस्त्रक्रिया टाळावी ! त्यांचा मुलगा नकुल अमेरिकेत न्यूयॉर्कमध्ये प्रसिद्ध व यशस्वी डॉक्टर आहे. दुसरा मुलगा निखिल पुण्यात ‘वॉलनट‘ नावाची बालकेंद्री शिक्षणाची शाळा चालवतो. शाळेच्या तीन शाखांत चार हजार विद्यार्थी आहेत ! डॉक्टर सश्रद्ध आहेत. ‘तो’ डॉक्टराच्या हातून रोग्याला बरा करतो अशी त्यांची भावना आहे. त्यांचा कल आध्यात्मिक आहे. ते आरंभी बेलसरे पंथीय होते. पण त्यांनीच सुचवल्यामुळे डॉक्टर करकरे गोंदवलेकर यांच्या रामभक्ती पंथात गेले. ते दर तीन महिन्यांनी गोंदवल्याला जातातच, पण एरवीही तिकडे जाणाऱ्या एसट्यांकडे मैत्री पार्क स्टॉपवर आस्थेने लक्ष ठेवतात. ड्रायव्हर-कंडक्टर-प्रवासी यांच्यामार्फत रामाशी नाते जोडतात. अद्भुत गोष्ट म्हणजे ते पन्नासाव्या वर्षानंतर गाऊ लागले आणि गाण्यांच्या कार्यक्रमांत भाग घेऊ लागले ! ते शाळा-कॉलेजमध्ये इंग्रजी गाणी म्हणत, पण ती नक्कल असे. ते गेली तीन दशके उमेश खरे व किरण कामत या शिक्षकद्वयींकडे गाण्याचे रीतसर शिक्षण घेत आहेत. त्यांचे शंभर गाणाऱ्यांत तिसऱ्या-चौथ्या क्रमांकाचे ‘रेटिंग’ आहे. ते वयाची ऐंशी वर्षे पुरी करत असताना त्यांनी गाण्याची चक्क मोठी मैफल योजली आहे. त्यांच्याबरोबर गाण्यास स्त्रीरोगतज्ज्ञ संध्या पुरी आणि अन्य दोघे आहेत. मौज म्हणजे मुलगा नकुल अमेरिकेतून येऊन त्यावेळी दोन गाणी म्हणणार आहे ! कुतूहल असे, की रुग्णसेवेचा आनंद, रामभक्तीचा ध्यास आणि हिंदी सिनेमांची गाणी गाणे या तीन विभिन्न गोष्टी एका जिवात नांदतात कशा? तर डॉक्टरांचे साधेसोपे उत्तर असे, की त्यांच्या मनातील उत्कंठा भाव ! ती ओढ माणसाला जीवनाचे विविध रंग दाखवते. ते म्हणाले, की त्याच भावनेने ते तलावात जलतरण गेली पन्नास वर्षे करत आले आहेत; त्याही खेळात बक्षिसे मिळवली आहेत. डॉ. विनोद करकरे 9820075293 [email protected] - *दिनकर गांगल* -------------------------------------------------------------------------------------------------

दत्तात्रेय रामचंद्र बेंद्रे यांची मातृभाषा मराठी, पण त्यांनी ‘ज्ञानपीठ’ हा साहित्यातील अत्युच्य सन्मान कन्नड भाषेत लेखन करून मिळवला ! ते कवी होते. द.रा. बेंद्रे यांना ‘ज्ञानपीठ’ हा पुरस्कार मिळून पन्नास वर्षे पूर्ण झाली. बेंद्रे यांना ‘ज्ञानपीठ’ पुरस्काराच्या वेळी जे प्रशस्तिपत्र देण्यात आले त्यात लिहिले आहे, की “पुरस्कारपात्र ‘नाकुतन्ती’ या कन्नड काव्यसंग्रहातून वर्तमानाचे उपहासात्मक रूप, सांस्कृतिक भूतकाळाचा आणि भविष्यकाळाचा सशक्त प्रतीकांद्वारे निष्कर्ष; तसेच, स्थायी व समग्रात्मक मूल्यांचे समर्थन प्रस्तुत केले गेले आहे. बेंद्रे यांच्या काव्यात एखाद्या गोष्टीचे प्रकटीकरण व रूपांतरण करण्याची क्षमता आहे. त्यात व्यक्तीपासून समष्टीपर्यंतच्या सर्व गोष्टींचा समावेश आहे.” बेंद्रे यांच्या नंतरच्या वर्षीचा 1974 चा पुरस्कार मराठी भाषेतील लेखक वि.स. खांडेकर यांना मिळालेला आहे... संपूर्ण लेख - https://thinkmaharashtra.com/strength-of-motherhood-marathi-kannad-bilingual-poet-d-r-bendre/

'म्हण' ही लोकांच्या तोंडी सतत येऊन दृढ होते. न.चिं. केळकर यांनी म्हणीची व्याख्या ‘चिमुकले, चतुरणाचे, चटकदार असे वचन अशी केली आहे. कोशकार वि.वि. भिडे म्हणतात, ‘ज्यात काही अनुभव, उपदेश, माहिती, सार्वकालिक सत्य किंवा ज्ञान गोवलेले आहे, ज्यात काही चटकदारपणा आहे आणि संभाषणात वारंवार योजतात असे वचन म्हणजे म्हण होय.’ दुर्गा भागवत यांनी ‘जनतेने आत्मसात केलेली उक्ती म्हणजे म्हण’ असे म्हटले आहे. वा.म. जोशी म्हणतात, ‘थोडक्यात व मधुर शब्दांत जिथे पुष्कळ बोधप्रद अर्थ गोवला जातो, त्या वाक्यांना म्हणी असे म्हणतात’... संपूर्ण लेख - https://thinkmaharashtra.com/proverbs-heart-of-marathi-language/

संत एकनाथ यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाचे आणि ज्ञानदेवांच्या समाधीचे संशोधन प्रथम केले !. नाथांनी त्यांच्या वाङ्मयातून भागवत धर्माच्या परपंरेचे सातत्य आणि विकास साधला. त्यांचे नाथ भागवत, रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण हे तात्त्विक चिंतनपर ग्रंथ. नाथांच्या आत्माविष्काराला वाट मिळते ती प्रामुख्याने त्यांच्या स्फूट रचनेतून. तशा स्फूट रचनांत अभंग, भारुडे, गवळणी, विरहिणी, कृष्णकथा, पदरचना अशा साऱ्यांचा समावेश होतो. संत एकनाथ यांच्या गवळणी विशेष प्रसिद्ध आहेत... संपूर्ण लेख - https://thinkmaharashtra.com/saint-eknaths-gavalani/

मल्लखांब दिन 15 जून रोजी साजरा होतो. योगायोगाची बाब म्हणजे तो दिवस वैद्य म.द. करमरकर यांचा स्मृतिदिन असतो. करमरकर हे मिरजेचे. त्यांनी एक वैद्य या नात्याने महिलांना मल्लखांब शिकवण्याचे आव्हान स्वीकारले. त्यांनी त्यांच्या स्वत:च्या आयुर्वेद संशोधनाचा तो विषय बनवला. त्यांनी स्वत:च्या सहा व चार वर्षांच्या कन्यांना आणि पत्नीला त्या प्रयोगाचा भाग बनवले ! त्यांचा तो निर्णय 1944 साली धाडसाचा होता. मिरजेसारख्या निमग्रामीण भागात पत्नीला नऊवारी पातळावर व दोन मोठ्या मुलींना शर्ट-हाफपॅण्टवर धावण्याच्या सरावास सोडणे, त्यांच्या आहारावर काटेकोर लक्ष ठेवत. करमरकर यांनी अंबाबाई तालमीत पत्नी व मुली यांना आखाड्यात उतरवले आणि वेताच्या मल्लखांब प्रशिक्षणाचे प्रयोग केले... संपूर्ण लेख - https://thinkmaharashtra.com/m-d-karmarkar-took-mallakhamb-to-womens-world/

वाचण्यास सोयीचे म्हणून मूळ प्रत पाठवत आहे. _*हस्ताक्षरवेडा किशोर कुळकर्णी!*_ शाळेतील मुले भले मोबाईलवेडी झाली असतील, पण त्यांना अजून गृहपाठ हस्ताक्षरांत पुरा करावा लागतो; परीक्षांतही पेपर ‘लिहावे’ लागतात. मात्र ते लेखन सुंदर हस्ताक्षरांत असावे असा आग्रह कोणाचा नसतो. सुरेख, नीटनेटक्या हस्ताक्षरातील लेखनास पाच गुण जास्त मिळतील असे प्रलोभन पूर्वी असे. सुवाच्य, डौलदार हस्ताक्षर हे व्यक्तीचे भूषण मानले जाई. आता मुदलात लेखनच ‘मेसेज’पुरते उरलेले आहे. त्यामुळे सुंदर हस्ताक्षर या गुणाला समाजात किंमत राहिलेली नाही; जशी ती पाढे पाठ असण्यालाही नाही. योगायोग असा, की हस्ताक्षर असे कालबाह्य होत असताना अक्षराचे वळण कलेच्या पातळीवर नेणारा चित्रकार अच्युत पालव यास केंद्र सरकारचा पद्मश्री पुरस्कार याच आठवड्यात जाहीर झाला आहे. र.कृ. जोशी, कमल शेडगे यांनीही आयुष्यभर अक्षरलेखनाचाच ध्यास घेतला. त्यांच्यासारखेच काही निष्ठावान सौंदर्यभोक्ते अजूनही शाळाशाळांत जाऊन सुलेखनाचा आग्रह धरतात. तसाच जळगावचा किशोर कुळकर्णी आहे. त्याने गेल्या तीस वर्षांत चारशे शाळांमध्ये जाऊन दोन हजारांपेक्षा जास्त मुलांना सुंदर हस्ताक्षराचे पाठ दिले आहेत. किशोर हस्ताक्षर लेखनासाठी शास्त्रोक्त पद्धत वापरतो. अक्षर सुंदर, टपोरे, वळणदार दिसण्यासाठी काय केले पाहिजे? वर्णातील मुख्य़ रेषा सरळ काढलेली मोठी असावी, अक्षरातील उंची, दोन अक्षरांतील अंतर, त्यांची जाडी, लिहिण्यासाठी पेन कोणता असावा, कागदावर पेन कसा चालवावा – पेन चालवण्याची दिशा, लेखन करण्याची गती, वळण, ते कसे व कोठे थांबवावे? अशा मुद्यांवर किशोर कार्यशाळेत सोदाहरण मार्गदर्शन करतो. रामदास स्वामींनी साडेचारशे वर्षांपूर्वी ‘अक्षर घडसुनी करावे सुंदर |’ असे लिहून ठेवले आहे. त्यावेळी मुद्राक्षरेच नव्हती; फक्त हस्तलेखन होई. चांगल्या हस्ताक्षराचे महात्म्य प्रथम टाइपरायटरमुळे संपले. नंतर संगणकावर सरसकट टाइपच करावे लागत असल्याने वेगवेगळ्या वळणांचे फॉण्ट उपलब्ध झाले. तेथे स्वहस्ताक्षराचा फॉण्टदेखील निर्माण करता येऊ शकतो. किशोर सांगतो, की गुगल हँडरायटिंग ॲप्लिकेशनने अक्षर गिरवता येते ! किशोर कुळकर्णी याने पदवी अंमळनेरच्या कॉलेजमधून घेतली. त्याने नाशिकच्या एचपीटी कॉलेजमधून पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्याच्यावर तेथे नाना लाभे यांचा प्रभाव पडला. नानांचा ‘घडवा सुंदर हस्ताक्षर’ असा उपक्रम होता. त्यांनीच किशोरच्या अक्षरांना सुंदर वळण दिले. किशोरने तोच प्रयोग पुढे चालू ठेवला आहे. हस्ताक्षराकडे दुर्लक्ष होते, यामुळे किशोर व्यथित असतो. परंतु अलिकडेच, हस्ताक्षर दिनानिमित्ताने (२३ जानेवारी) त्याला उमेद देणारा फोन परभणी जिल्ह्याच्या सेलू गावातून आला. तेथे जिल्हा परिषदेने शाळाशाळांमध्ये हस्ताक्षर स्पर्धा घेतली होती. तिचा बक्षिस समारंभ व त्याच वेळी मुलांची हस्ताक्षर कार्यशाळा असा सेलूकरांचा बेत आहे. त्यांनी किशोरला मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलावले आहे. त्यामुळे किशोर खुषीत आहे. त्याचा ठाम विश्वास आहे, की चांगल्या हस्ताक्षराला मरण नाही ! किशोर कुळकर्णी 9420607059 [email protected]; [email protected], - _*दिनकर गांगल*_ 9867118517 -------------------------------------------------------------------------------------------------